Saturday, November 18, 2017

.....अन् मी इंदिरा 'भक्त' झालो!


इंदिरा गांधींच्या ह्या जन्मशताब्दी वर्षामधे मागे वळून पहात मी स्वत:लाच प्रश्न विचारतोय की मी इंदिरा भक्त कां व कसा झालो? तसे पहाता बालपणापासून माझ्यावर संस्कार होत होते ते डाव्या विचारांचे! घरी येणे जाणे असलेल्या कम्युनिस्ट नेत्यांच्या चर्चांमधून, भांडवलदारांचा पाठीराख्या काॅंग्रेसच्या कडवट विरोधाचे प्रतिबिंब पडत असे. काॅंग्रेस म्हणजे गरीबीला जबाबदार असलेला पक्ष अशी माझीही धारणा होऊ लागली होती. अचानक संस्थानिकांची तनखा बंदी, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, इंदिरा गांधींचा काँग्रेसमधील बड्या धेंडांशी सुरू झालेला संघर्ष, इंडिकेट व सिंडीकेट अशी काॅंग्रेसची विभागणी, अशा घटना एका पाठोपाठ एक आकार घेऊ लागल्या. इंदिरा गांधींची पुरोगामी व समाजवादी धोरणे ह्या मुळे काॅंग्रेस विरोध हाच राजकारणाचा पाया असलेल्या समाजवाद्यांसह कम्युनिस्ट मंडळीही प्रभावित होऊ लागली. हा बदल मला जाणवत असे.  

'वो कहते है इंदिरा हटाव, मैं कहती हूॅं गरीबी हटाव' असे म्हणत इंदिरा गांधी बहुमत मिळवून सत्तेवर आल्या. गरिबांच्या कल्याणाच्या योजना आखणाऱ्या इंदिरा गांधीनी जनतेच्या मनामधे स्थान निर्माण केले. आम्हां शाळकरी मुलांच्या मनामधेही इंदिराजींबद्दल आदरभाव निर्माण होऊ लागला. एव्हढ्यांतच पूर्व पाकिस्तानमधे पाकिस्तानी लष्करशहानी पूर्व बंगालमधील जनतेवर केलेल्या अत्याचारांनी जनता होरपळून निघाली. इंदिरा गांधीनी पूर्व पाकिस्तानमधील जनतेच्या लढ्याला पाठींबा देऊन भारतीय फौजाना पूर्व पाकिस्तानमधे पाठवण्याचा निर्णय घेतला. युध्दाला तोंड फुटले. अमेरिकेच्या सातवे आरमार पाठवून युध्दामधे हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांनी जराही विचलित न होता इंदिरा गांधीनी भारतीय फौजांची आगेकूच सुरूच ठेवली. १६ डिसेंबर १९७१ ह्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने भारतीय फौजांसमोर शरणागती पत्करली. बलशाली भारताचे दर्शन जगाला घडविणाऱ्या कणखर व धैर्यशील नेत्या इंदिरा गांधी जनतेच्या गळ्यातील ताईत झाल्या.विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी देखिल इंदिराजींचा उल्लेख 'दुर्गा' असा करून त्यांच्या हिंमतीची दाद दिली. आम्हां मुलांमधेही पाकिस्तानला अद्दल घडविणाऱ्या इंदिराजींविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली.

इंदिरा गांधी १९७४ साली अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, आंदोलने सुरू झाली. गुजरात व बिहारमधे विद्यार्थ्यांनी सरकारविरूध्द रणशिंग फुंकले. जयप्रकाश नारायण ह्यांनीआंदोलन दडपू पहाणाऱ्या इंदिरा गांधी सरकार विरूध्द 'संपूर्ण क्रांती' चा नारा देत आंदोलनाचा रोख दिल्लीकडे वळवला. जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष संघटित होऊ लागले. जाॅर्ज फर्नांडिस ह्यांनी रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला. ही आंदोलने व संप दडपशाहीच्यी मार्गाने मोडून काढू पहाणाऱ्या इंदिरा सरकारविरोधात वातावरण तापू लागले. मी एव्हाना तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी झालो होतो. विद्यार्थ्यांमधे इंदिरा गांधींच्या विरोधात विद्यार्थीद्वेष्ट्या असल्याबद्दल संताप व्यक्त होऊ लागला होता. ह्या संताप यात्रेमधे मीही  सहभागी झालो. इतक्यातच, इंदिरा गांधीनी निवडणुकीत अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत दि. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद न्यायालयाने  त्यांना सहा वर्षे कोणत्याही संसदीय पदावर रहाण्यास मनाई करणारा आदेश दिला. इंदिरा गांधींच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला. २५ जून १९७५ रोजी दिल्लीमधे जाहीर सभेमधे जयप्रकाश नारायण ह्यांनी इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी करतानाच पोलीस, लष्कर व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचे आदेश धुडकावण्याचे आवाहन केले. इंदिरा गांधीनी ह्याची गंभीर दखल घेत दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह आणीबाणीला विरोध करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुंग भरून गेले. प्रसार माध्यमांवर बंधने लादून त्यांची मुस्कटदाबी करण्यांत येऊ लागली. दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरामधे संजय गांधींच्या सूचनेवरून शेकडो झोपड्यांवर बुलडोझर फिरवून त्या जमीनदोस्त करण्यांत आल्या. सरकारी कार्यालयांमध्ये शिस्तिचा अतिरेक होऊ लागला. नसबंदी कार्यक्रमामधे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्यांनी लोकांमधे सरकारविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधीविषयीचा माझा उरलासुरला आदर संपुष्टांत येऊ लागला. मार्च १९७७ मधे अनपेक्षितरीत्या इंदिरा गांधीनी आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याची घोषणा केली. हुकूमशहा इंदिरा गांधी आणीबाणी लादून सत्ता आपल्या हाती कायम ठेवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत आहेत असा प्रचार करणारे विरोधी पक्षही चकित झाले. ह्या धक्क्यातून सावरत कम्युनिस्ट वगळता विरोधी पक्ष जयप्रकाश नारायण ह्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले. जनता पक्षाची स्थापना झाली. जनता पक्षाला देशभर सर्व थरातून जनतेचा पाठिंबा मिळू लागला. मीही मित्रांसमवेत जनता पक्षाच्या सभांना उत्साहाने जाऊ लागलो. निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींना व काॅंग्रेसला जनतेने सपशेल नाकारून जनता पक्षाला विजयी केले. खरीखुरी लोकशाही प्रस्थापित झाल्याचा आनंद मलाही झाला. जनता पक्षाचे सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. परंत जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेकडे लक्ष देण्याऐवजी इंदिरा गांधींविरूध्द सूडबुध्दीने कारवाया करणे हेच उद्दिष्ट असल्याचे दिसू लागले. अशातच सूडाने पेटलेल्या नेत्यांनी इंदिरा गांधीना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याचा आततायी निर्णय घेतला.अटकेतील इंदिरा गांधींविषयी जनतेमधे सहानुभूतीची भावना निर्माण झाली व जनता पक्षाच्या नेत्यांविषयी चीड! काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर ह्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली व लोकही त्यामधे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. इंदिरा गांधी ह्यांना झालेली अटक न आवडल्याने आम्हीही ह्या निदर्शनांमधे सहभागी होऊ लागलो. जानेवारी १९७८ मधे इंदिरा गांधीनी काॅंग्रेस (आय) पक्षाची स्थापना केली व लगेचच फेब्रुवारी मधे झालेल्या कर्नाटक व आंध्र मधील विधानसभा निवडणुकांमधे जनता पक्षाला धूळ चारत विजय मिळवला. इंदिरा गांधींना लोक  पुन्हा स्वीकारीत असल्याची ही पावती होती. इंदिरा गांधींची विजयी घोडदौड आम्हां तरूणांना व विद्यार्थ्यांना प्रभावित करू लागली होती. मुसळधार पावसातून कधी जीपने, कधी ट्रॅक्टरने प्रवास करीत तर मध्येच वाहन बंद पडल्यावर चिखलातून, कंबरेपर्यंत पाण्यातून वाट काढीत, शेवटी हत्तीवर बसून बिहारमधील दलित हत्याकांड झालेल्या बेलचीतील दलितांचे अश्रू पुसणाऱ्या इंदिराजीनी आमच्यावरच नव्हे तर लाखो देशवासीयांवर आपल्या धैर्यशील स्वभावाने गारूड केले होते.

१९७९ मधे मोरारजी देसाईंचे जनता सरकार पायउतार झाले.चौधरी चरणसिंग ह्यांचे सरकारही  टिकू शकले नाही. जानेवारी १९८० मधे लोकसभेच्या निवडणुका झाल्या. जनतेने संधी देऊनही सरकार चालवू न शकलेल्या अकार्यक्षम व भांडखोर नेत्यांना विटलेल्या भारतीय जनतेने इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर पसंतीचे शिक्कामोर्तब करीत त्यांच्या काॅंग्रेस ( आय) पक्षाला बहुमत देऊन निवडून दिले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण पुन्हा एकदा आम्हां तरुणांना वाटू लागले.
 
त्याच सुमारास पंजाबमध्ये फुटीरतावादी शक्तींनी डोके वर काढण्यास सुरूवात केली. जर्नेलसिंग भिंद्रनवाले ह्या संताने स्वतंत्र खलिस्तानची मागणी करून हिंसक कारवायांना चिथावणी दिली. हिंसेचा आगडोंब उसळला. ज्येष्ठ पत्रकार, पोलीस अधिकारी तसेच निरंकारी पंथाचे अनुयायी ह्यांच्या खुले आम हत्या होऊ लागल्या. अमृतसरच्या पवित्र सुवर्ण मंदीरामध्ये तळ ठोकून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अनुयायांकडून अतिरेकी कारवायांची सूत्रे हलत व स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला बळ दिले जाई. देशभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पंजाबमधे वेळीच अतिरेक्यांना ठेचून काढणारा निर्णय घेण्याचे धैर्य व हिंमत  इंदिरा गांधींपाशी आहे याची मला खात्री होती. पंजाबला देशातून फुटून जाण्याच्या शक्यतेपासून वाचवायचे असेल तर कठोर धाडसी निर्णय घ्यावे लागतील याची खूणगाठ मनाशी बांधून इंदिरा गांधीनी लष्करी अधिकाऱ्यांशी  सुवर्ण मंदीरामध्ये लष्कर घुसवून तेथे ठाण मांडून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अतिरेकी अनुयायांना हुसकावून लावण्यासंबंधी विचार विनिमय केला. असे करणे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणारे ठरेल असा सल्ला पंतप्रधान  इंदिरा गांधीना देण्यात आला. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण देश एकसंघ ठेवण्यासाठी ही कारवाई करावीच लागेल असे सांगून इंदिरा गांधीनी लष्कराला सुवर्ण मंदीरामध्ये 'आॅपरेशन ब्ल्यू स्टार' ह्या कारवाईचे आदेश दिले. ह्या कारवाईत सशस्त्र प्रतिकार करणारे भिंद्रनवाले व त्यांचे अनेक अनुयायी ठार झाले. सुवर्ण मंदिराच्या भिंती रक्ताने माखल्या. पवित्र तख्ताचेही नुकसान झाले. शीख समुदायामधे संतापाची लाट उसळली. याची किंमत मोजावी लागणार होती ह्याची इंदिराजींना  कल्पनाही होती. ३१आॅक्टोबर,१९८४ रोजी इंदिरा गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्यांचा वर्षाव करून इंदिराजींची हत्या केली. इंदिराजीनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होत. ह्या धक्क्यातून सावरणे मला फारच अवघड गेले. काही दिवस आधीच सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकाना वगळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु धर्मनिरपेक्षता हे जीवनमूल्य मानणाऱ्या इंदिराजीनी 'आपण सेक्युलर नाही आहोत का?' असा प्रश्न विचारून हा निर्णय बदलला. इंदिराजींची धर्मनिरपेक्षतेवरची ही निष्ठा माझ्या मनावर ठसा उमटवणारी ठरली. भुवनेश्वर येथे इंदिराजीनी केलेल्या अखेरच्या भाषणातील काळजाचा ठाव घेणारे शब्द " देश सेवेमधे मला मृत्यू जरी आला तरी माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब देशाला बलशाली बनवेल" माझ्या कानामधे गुंजत राहू लागले. कालपरवापर्यंत इंदिराजींवर कधी प्रेम करणारा तर कधी त्यांचा तिरस्कार करणारा मी इंदिराजींचा भक्त झालो. इंदिराजींच्या विचारांशी पक्की बांधिलकी ठेवून राजकारणामधे सक्रीय होण्याचा माझा निर्णय झाला. इंदिराजींना माझी हीच खरी श्रध्दांजली होती. वयाच्या पंचविशीमधे असा मोठा बदल जीवनामधे झाल्यावर मी इंदिराजींच्या जीवनाचा व त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा अधिक सखोल मागोवा घेण्यास सुरुवात केली. इंदिराजीनी राबवलेले अणुशक्ती कार्यक्रम व धोरण, हरित क्रांती योजना, सिक्किमचे सामीलीकरण, केलेले पर्यावरण विषयक कायदे, रशियाशी मैत्रीचे नाते जोडण्याची भूमिका हे पहाता इंदिराजींची विविध रुपे माझ्या समोर आली. इंदिराजी ह्या केवळ राजकीय नेत्या नव्हत्या तर त्या एक बहुआयामी व्यक्तीमत्व होत्या ह्याची खात्री पटत गेली. इंदिराजींविषयी माझ्या मनामधे अढी निर्माण करणारी आणीबाणी कशासाठी होती हे सखोल वाचन व अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यावर उलगडत गेले. विरोधी पक्षांना फूस लावून भारतामधे अस्थिरता माजवण्याचा साम्राज्यवादी शक्तींचा डाव उधळून लावण्यासाठी इंदिराजीनी अपरिहार्यता म्हणून हा निर्णय घेतल्याची खात्री पटत गेली. इंदिराजी हुकूमशहा होत्या का? याचे उत्तर ठामपणे नाही असेच द्यावे लागेल कारण त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्तालोलुप नेत्या असत्या तर आपल्या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे याची जाणीव असतानाही आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याचा निर्णयच त्यांनी घेतला नसता. इंदिराजींच्या राजकारणाचे व व्यक्तीमत्वाचे पदर जसजसे उलगडले जाऊ लागले तसतसा मी इंदिराजींच्या विचारांशी अधिकाधिक निष्ठावंत होत इंदिराजींचा केवळ चाहताच नव्हे तर 'भक्त' झालो तो आयुष्यभरासाठी !


अजित सावंत

Sunday, October 1, 2017

इमानदारीचे उरत नाही तिथे बेईमानीचे किती दिवस पुरणार?

मंत्रालयामधे कामगार मंत्र्यांसोबत आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेले होतो. मंत्री महोदयांना येण्यास थोडा वेळ लागणार होता म्हणून त्यांच्या कार्यालयाबाहेर प्रतीक्षाकक्षात बसलो. मोबाईलवर वाॅट्स अॅप संदेश, युट्यूब  व फेसबुक चाळण्याचा चाळा करीत वेळ घालवावा ह्या हेतूने! मधेच प्रसाधनगृहात थोडे ताजतवाने होऊन येण्यासाठी उठलो. प्रसाधनगृहामधे केस विंचरण्यासाठी कंगवा काढण्यास पॅंटच्या मागील खिशामधे हात घातला व त्याच खिशात ठेवलेले पाकीट तेथे नसल्याचे माझ्या लक्षांत आले. येताना तर पाकीट सोबत होते व त्यातील ओळखपत्र मी प्रवेशद्वारावर दाखवलेही होते. येण्याजाण्याच्या मार्गावर, प्रवेशद्वाराजवळ, सुरक्षा नियंत्रण कक्षामधे व हाऊस किपिंग कर्मचाऱ्यांना कुणा अभ्यागतास पाकीट मिळाल्याबात व त्याने ते कुणाकडे सोपवले आहे कां याची चौकशी करून झाली. पाकीट मिळत नाही हे पाहून माझे धाबे दणाणले. पाकीटात बऱ्यापैकी रक्कम होती पण त्याचबरोबर क्रेडिट व डेबिट कार्डे, विविध ओळखपत्रे, वाहन चालक परवाना आदि महत्त्वाच्या वस्तू असल्याने अधिक चिंता होती. बॅंकाना कळवून कार्डांवरील व्यवहार थांबविण्याच्या सूचना दिल्या. आता पुन्हा ती कार्ड कार्यान्वित करणे, हरवलेली ओळखपत्रे नव्याने मिळवणे हा मोठा व्यापच पाठीशी लागणार होता. चिंताग्रस्त होऊन मार्गिकेमधे उभा असतानाच, एक तरुण व्यक्ती लगबगीने माझ्यापाशी आली. साधासाच पेहराव व हाती कागदपत्रे ठरवण्यासाठी असलेली पिशवी, अशा त्या व्यक्तीने तुम्ही अजित सावंत कां? असा प्रश्न केला. 'साहेब तुमचे पाकीट मला मिळाले आहे. मी ते घेऊन येतो. तुम्ही येथेच थांबा' असे सांगून तो निघूनही गेला. थोड्या वेळाने तो परतला ते पाकीट घेऊनच! माझा जीव भांड्यात पडला. क्षणातच माझ्या डोक्यावरचे चिंतेचे ओझे दूर झाले. 'साहेब, हे पाकीट मला प्रतिक्षाकक्षाजवळ काॅरिडाॅरमधे मिळाले. मी पाकीटातल्या ओळखपत्रावरचा फोटो पाहिला व तुम्हाला ओळखले. मी तुम्हाला गेला तासभर शोधतोय.  माझे नाव मनोज राठोड! मी आमदार हरिभाऊ राठोडांसोबत असतो व त्यांच्याकडे गावांहून येणाऱ्यांची मंत्रालयातील कामे करण्यासाठी मदत करतो' त्यांने सांगितले. मी त्याचे मनापासून आभार मानले व विचारले 'तुम्ही मंत्रालयातच नोकरी करता कां?' हलकेच हसून त्या तरूण माणसाने आपण नोकरीस नसून ज्यांना मदत करतो ते काहीबाही देतात व  तेच आपले चरितार्थ चालविण्यास पुरेसे असते असे समाधानाने सांगितले. मनोजची आर्थिक स्थिती साधारण असल्याचे एव्हाना मला स्पष्ट झालेच होते. पाकिटातले सर्व काही जागच्याजागेवर होते. 'मनोज पाकिटामधे चांगलीच रक्कम असताना तुला मोह कसा रे नाही झाला?' मी मनोजला खांद्यावर हात ठेवत विचारले. *'साहेब, इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार?'* भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ज्या मंत्रालयाच्या काॅरिडाॅर मधे अनेकदा ऐकायला मिळाल्या तेथेच प्रामाणिक मनोजने  त्याच्या साध्या निर्मळ भाषेत इमानदारीचे तत्वज्ञान समोर ठेवले होते. आपल्या कष्टाची रोजीरोटी कमावणाऱ्या मनोजच्या चेहऱ्यावर त्याचा अभिमान विलसत होता. मनोजला व त्याच्या इमानदारीने जगण्याच्या विचाराला मी मनोमन सलाम ठोकला. मनोजला मी कृतज्ञतापूर्वक काही बक्षिस देऊ केले. ते स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मनोजच्या हाती बक्षिस कोंबून मी म्हणालो 'मनोज तुझ्या इमानदारीची दिलेली ही दाद आहे'. 'इमानदारीने कमावलेले जगताना जवळ नाही उरणार तर बेईमानीने मिळालेले किती दिवस पुरणार? मनोजचे हे विचार मंत्रालयाच्या भिंतीभिंतीवर, लिहून फ्रेम करून लावावेत असे माझ्या मनात येत असतानाच हसतमुख मनोजने माझा निरोप घेतला.

Friday, May 5, 2017

१ मे संघर्षाचा स्मरण दिन हा कंत्राटी सफाई कामगारांचा विजय दिन!

१ मे कामगार दिनाच्या परळ येथील कामगार मैदानातील अनेक कामगार मेळाव्यांना मी अगदी १० वर्षांचा असतानासुध्दा माझे वडील काॅ पी जी सावंत ह्यांच्यासोबत उपस्थित रहात असे. वातावरण भारलेले असे. मैदानावर सर्वत्र लाल बावटे व व्यासपीठासमोर डौलाने फडकणारा लाल झेंडा उपस्थित कामगारांमधे चैतन्य निर्माण करत असे. 'जगातील कामगारांनो एक व्हा', 'लाल बावटे की जय', 'कामगार एकजुटीचा विजय असो' ह्या घोषणांनी आसमंत निनादून जाई. डोक्यावर लाल टोपी व दंडाला लाल पट्टी बांधलेले तरूण कामगारांचे पथक 'रेड गार्डस्' सभेची चोख व्यवस्था व बंदोबस्तही ठेवत असे. शेकडोंच्या संख्येने कामगार हातामधे लाल झेंडे घोषणा देत सभेला येत.कालांतराने मुंबईमधे शिवसेनेचा उदय झाला व कम्युनिस्ट व सेनेमधे संघर्ष सुरू झाला. मुंबईतील कामगार चळवळ व पर्यायाने कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी सेनेला हाताशी धरून रचला. सेनेकडे तरुणांचा ओघ वाढत चालला तसतसा कम्युनिस्ट चळवळीचा प्रभावही ओसरू लागला. संपफोड्या सेनेने अनेक कारखान्यातील डाव्या कामगार संघटना सरकारी आशीर्वादाने मोडीत काढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे १९८२ साली झालेल्या गिरणी संपाचे पर्यवसान सरकार व मान्यताप्राप्त कामगार संघटना आणी मालकवर्ग ह्यांच्या हातमिळवणीमुळे गिरण्या बंद होण्यांत झाले. हजारो गिरणी कामगार बेकार झाले व देशोधडीला लागले. नंतरच्या काळात जमिनीला येत असलेली सोन्याची किंमत पाहून उद्योगपतीनी धडाधड कारखाने बंद पाडून कारखान्यांच्या जमिनी विकून आपले उखळ पांढरे करण्यास सुरूवात केली. परिणामी मुंबईतील कामगारवर्ग हळूहळू मुंबईबाहेर फेकला जाऊ लागला. कामगार चळवळही क्षीण झाली. मे दिनाच्या भव्य मिरवणुका व कामगारांच्या मेळाव्यांना कामगारांच्या तुरळक उपस्थितीने ओहोटी लागली. ह्या पार्श्वभूमीवर आज १ मे कामगार दिनानिमित्त 'कचरा वाहतूक श्रमिक संघाने' २७०० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महापालिकेच्या नोकरीत कायम करून सर्व लाभ देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मिळविल्यानिमित्त विजय मेळावा आयोजित केला होता. ह्या विजय मेळाव्यामधे ज्येष्ठ कामगार नेते काॅ यशवंत चव्हाण, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्यासह डाव्या चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते. कालपरवापर्यंत किमान वेतन व अन्य सुविधांपासून वंचित २७०० कामगारांना पालिकेच्या नोकरीत कायम होण्याचा निर्णय झाल्याने कामगारांच्या उत्साहाला उधाण आले होते. १२ वर्षांच्या संघर्षातून, काॅ मिलिंद रानडे, काॅ विजय दळवी, काॅ दिपक भालेराव ह्यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सफाई कामगारांनी मिळविलेला हा विजय अलिकडच्या काळामधे ढेपाळत चाललेल्या कामगार चळवळीने मिळवलेला मोठा विजय आहे. शोषणाच्या वरवंट्याखाली पिचलेल्या, देशातील तमाम कंत्राटी कामगारांना हा विजय संघर्षाची प्रेरणा देईल व खऱ्या अर्थाने पथदर्शी ठरेल. ह्या विजय मेळाव्यामुळे अनेक वर्षांमधे प्रथमच १ मे कामगार दिन हा एका वेगळ्या उत्साहात साजरा झाला. पुन्हा एकदा मन आश्वस्त झाले. शोषणकर्त्यांशी संघर्ष करून कामगारांना यश मिळवता येते. कानांमधे घोषणा गुंजत राहिल्या 'कामगार एकजुटीचा विजय असो!'

Tuesday, January 3, 2017

हे गड, ते गड व मावळ्यांचा गनिमी कावा

मुंबईतील शिवाजी पार्क मधे देखिल मुख्य प्रवेशद्वारावर,सेना भवनकडे तोंड करून राम गणेश गडकरींचा पुतळा बसविण्यांत आला होता. पुढे अचानक गडकरी पुतळ्याची रवानगी आज गडकरी चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात झाली. कशासाठी कोण जाणे? पुतळा अगदी थेट सेना भवनासमोर बसवला गेला. शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांना प्रथम शिवाजी पार्क येथे व नंतर सेना भवनासमोर पुतळा बसवताना गडकरींच्या पुतळ्याचे वावडे नव्हते व आज ही नाही. गडकरी सुध्दा येथून तिथे विनातक्रार आले. मग ५५ वर्षे पुण्यांतील संभाजीराजे उद्यानात असलेल्या गडकरींच्या पुतळ्याबाबत मात्र आज संभाजीराजांच्या शिपायांचा राग कां बरे उफाळून यावा बरे? ह्या मावळ्यांची व शिपायांची भक्ती व राग कधी कुठे उफाळून येतो हे स्वत: राजेच जाणोत! निवडणुकांचे नगारे वाजू लागलेत महाराज...

Wednesday, June 15, 2016

कै मारुती गुरव ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

माहीममधील काॅंग्रेसच्या जुन्या व मोजक्याच निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक मारुती गुरव यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. ते काही महिने आजारी होते व काही वर्षांपूर्वी त्यांची हृदय शस्त्रक्रियाही झाली होती. मारूती गुरव यांची कंपनी अचानक बंद झाली व त्यांनी रहात असलेल्या इमारतीसमोर भाजीविक्रीचा धंदा सुरू केला. मेहनत, सचोटी व नम्रता ह्या गुणांमुळे त्यांचा धंद्यात जमही बसला. लोक त्यांनी भाव सांगितल्यावर फारशी घासाघीस न करता भाजी विकत घेत ती त्यांच्यावरील विश्वासामुळेच! नोकरीत असताना व नोकरी गेल्यावर कष्टपूर्वक आपल्या कुटुंबाला आधार देत असताना गुरव काॅंग्रेससाठी निष्ठेने व निरपेक्ष काम करीत. काॅंग्रेसच्या सभा, आंदोलने वा कार्यक्रम त्यांची आवर्जून उपस्थिती असे. निवडणुकीत तर ते आपली कामे आपल्या पत्नीवर व मुलांवर सोपवून पक्षासाठी बाहेर पडत. निवडणुकीच्या मतदार स्लीपा वाटणे, आपल्या विभागात टेबल टाकून मतदारांना मार्गदर्शन करणे, उमेदवारासाठी परिसरातील कार्यर्त्यांना मतदान प्रतिनिधी वा मतमोजणी प्रतिनिधी पाठवणे ह्यासाठी पक्षाचे उमेदवार मारूती गुरव ह्यांच्यावर विश्वास टाकत. माझ्या स्वत: च्या निवडणुकीत देखिल मारूती गुरव हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत होते. काॅंग्रेस पक्षाकडे मारूती गुरवानी स्वत:साठी कोणतेही पद वा उमेदवारी कधीही मागितली नाही. पक्षाच्या नावावर स्वत:ची घरे भरण्याचा उद्योग करणाऱ्यांपैकी गुरव कधीही नव्हते म्हणूनच कोणत्याही नेत्याची हुजरेगिरीही त्यांनी केली नाही. पक्षातील गटबाजीशी तर त्यांचा दुरूनही संबंध नसे. काही वर्षांपूर्वी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली. काही सहकाऱ्यांनी योग्य उपचार मिळण्यासाठी त्यांना सहकार्य केले. मदतही मिळवून दिली. परंतु ज्यांना लोकप्रतिनिधी बनविण्यासाठी मारूती गुरवांनी प्रयत्नांमधे कसर केली नाही त्यांनी मात्र स्वत:च्या खिशात हात घालून गुरवांना मदत केली नाही. याचे मात्र दु:ख वाटते. मारूती गुरव हे आज काॅंग्रेसला कशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची गरज आहे त्याचा आदर्श निर्माण करून गेले आहेत. मारूती गुरव ह्यांच्यासारखे कार्यकर्ते पक्ष उभा करीत असतात व त्याच वेळेस नेत्यांचे हुजरे, दलाल व उपरे पक्ष धुळीस मिळवत असतात. काॅंग्रेस पक्षाला आज पराभव पचवून फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यायची असेल तर हजारो मारूती गुरव विभागाविभागामधे तयार करावे लागतील व त्यांच्या हाती पक्षाची संघटना सोपवावी लागेल. ह्या लोकांमधे विश्वासार्हता असलेल्या सामान्य कार्यकर्त्याचा चेहरा काॅंग्रेसचा चेहरा बनवावा लागेल, अन्यथा काॅंग्रेस पक्ष दुर्बिण घेऊन शोधावा लागेल. कै. मारूती गुरव ह्यांना माझी विनम्र श्रध्दांजली! 🙏🙏🙏

Friday, May 13, 2016

मन झाले 'सैराट' सैराट

काल सैराट पाहिला. आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुसंख्य लोक समाजातील अनेक घडमोडी व वास्तवापासून दूर असतात. स्वत:समोरचे प्रश्न किंवा सुखवस्तू असण्यातून जोपासलेली चंगळवादी वृत्ती ह्यामुळे आजूबाजूला व विशेषत: आपल्यापासून भौगिलिक दृष्ट्या दूर किंवा सामाजिक दृष्ट्या अंतर राखून असलेल्यांच्या जीवनामधे काय घडत आहे याचे संपूर्ण भान त्यांना येत नाही. वर्तमानपत्रांतून वा टीव्हीवरच्या बातम्या पाहून माहीती मिळते परंतु वास्तवाचे भान येत नाही कारण माणसे आत्मकेंद्री व आत्ममग्न झाली आहेत. सामाजिक प्रश्नांची भयाणता केवळ माहीती मिळाल्याने कळली असती तर लोक अनेक प्रश्नांपासून अलिप्त राहू शकले नसते. अशा परिस्थितीमधे, समाजातील वास्तवावर नेमके बोट ठेवणारे सैराट सारखे चित्रपट त्यांना हलवून जागे करण्याचे मोठेच काम करतात. जातीचा वृथा अभिमान व सत्तेचाछ माज दोन प्रेमी जीवांची कशी ससेहोलपट करतात व शेवटी त्यांनी कष्टपूर्वक उभे केलेले जीवन स्वत:चा अहंगंड जोपासण्यासाठी उद्ध्वस्त करतात याचे हे चित्रण आहे. आजही ग्रामीण भागामधे समाजातील जातीय व आर्थिक उतरंडीमधे अगदी तळाला असलेल्या कुटुंबाचे जिणे दाखवल्याने अजूनही सामाजिक व आर्थिक समतेपासून समाज कित्येक मैल दूर आहे हे शहरी लोकांना समजून येते. साहित्यातून, चित्रपटातून  अनेकदा सामोरी आलेली ही प्रेम कहाणी, प्रेमिकांच्या जीवनातील सामाजिक व आर्थिक विषमतेचे अंतर किंवा जाती-धर्माने उभ्या केलेल्या भिंती, त्या ओलांडण्याचे त्यांनी केलेले धाडस व त्यामधे त्यांना आलेले यश वा अपयश ह्या नेहमीच्याच सूत्रावरची असली तरी ही कथा केवळ प्रेमाचीच नव्हे तर विशिष्ट समाजाच्या वाट्याला येत असलेल्या झिडकारलेपणाची, गांवगुंडांच्या माजाची तसेच जातपंचायत आदी प्रश्नांना हात घालून पुढे मंग्या, लंगडा प्रदीप, सलीम  ह्यांच्यासाख्या सच्च्या मित्रांची व यास्मिन दीदी ही मुस्लीम शेजारीण, तसेच स्वत:च्या कष्टमय जगण्यांतही प्रेमिकांना आश्रय देण्याचे मनाचे मोठेपण दाखविणाऱ्या अम्माचीही आहे. कोणत्याही जातीचा उल्लेख टाळला आहे परंतु ह्या कहाणीतील संघर्ष खाणारे-पिणारे व अर्धपोटी जगणारे ह्यांच्यामधला आहे. वरणभात तूप खाणारे ह्या पासून दूर आहेत! सोशल मिडीयावरच्या अंगावर येणाऱ्या प्रतिक्रियांचा अनुभव मी स्वत:ही घेत आहेच. जातीच्या अहंकारापोटी वा सामाजिक वास्तवाच्या अज्ञानापोटी अशा 'सैराट' प्रतिक्रिया देत आहेत. परंतु रोज किमान १० माणसे सैराट पाहिला कां असे विचारतात व चित्रपटगृहातही समाजातील सर्वच स्तरांतील लोक गर्दी करून एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लागून चित्रपट पहातात ह्या मधेच सैराटचे यश आहे. चित्रपट उत्कृष्ट झाला असला तरी काही तांत्रिक उणीवांवर बोट ठेवता येऊ शकते पण प्रेक्षकानीच डोक्यावर घेतल्याने त्या दोषांची चर्चा करणे निरर्थक आहे. असो सैराट आवडला. सर्वांनी पहावा. आजच्या युगामधे गैरलागू असलेला आपल्या जातीबाबत असलेला खोटा अभिमान दूर लोटून!  वास्तवातील जिणं जगणारे कलाकार व दिग्दर्शक नागराज मंजुळे ह्यांना दादा देण्यासाठी. अन् थोडंसं जळत्या वास्तवाचं भान येण्यासाठीही!  निश्चितच आवडेल.

सफाई कामगारांचे संघर्ष अभियान!



सिग्नलला थांबलेल्या बसमधे पसरलेल्या दुर्गंधीपासून सुटका व्हावी म्हणून प्रवाशांनी नाके रुमालाने घट्ट दाबून घेतली. खिडकीजवळच बसलेल्या काॅ मिलिंद रानडे ह्यांचं लक्ष शेजारून जात असलेल्या कचऱ्याच्या गाडीकडे गेलं. रानडेंची नजर लाॅरीतील दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगावर कागदावर काहीबाही पसरून जेवत बसलेल्या कामगारांवर पडली. ओकारी यावी अशा परिस्थितीमधे ही माणसे कशी बरे स्वस्थपणे खात बसली असावी? असा विचार त्यांच्या  मनांत आला. हे कामगार कुठे जातात, काय करतात हे प्रत्यक्ष पहायला हवे असे वाटून त्यांनी कचरा गाडीचा पाठलाग सुरू केला. गाडी देवनारच्या डंपिंग ग्राऊंडवर पोहोचली. तेथे दोन गेट होते. एक महापालिकेच्या कायम कामगारांकरिता व दुसरा कंत्राटी सफाई कामगारांसाठी! कंत्राटी कामगारांसाठी तेथे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ना मुतारी वा शौचालयाची! कुठे बसून चार घास पोटात ढकलावे तर जेवायला बसण्यापुरेशी  स्वच्छ जागाही नाही.  गाडीसोबत पोहोचलेले हे कंत्राटी कामगार गाडीतील कचरा स्वत: खाली करत होते. ५रू प्रति गॅलन प्रमाणे पाणी विकत घ्यायचे तेच पाणी पिण्यासाठी व तेच हात पाय धुण्यासाठी पुरवून वापरायचे! प्रत्येक कामगाराला गाडीच्या एका फेरीमागे ३५ रू हा दर ठरलेला. मुंबईच्या रस्त्यांवरील कचरा कुंड्यांमधे जमा झालेला कचरा घमेल्यातून गोळा करून गाडीमधे भरायचा व डंपिंग ग्राऊंडवर नेऊन टाकायचा हे काम! १२-१४ तास काम करून मुश्कीलीने ३ फेऱ्या होत. गाडी बंद पडली तर फेऱ्या कमी होत. हाॅटेलमधे तर कुणी घेतच नसे. तहान लागली तर पिण्याचे पाणी मिळणे दूरच! कचरा उचलून नेऊन मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांची ही स्थिती पाहून मिलिंद रानडे व त्यांचे सहकारी अस्वस्थ झाले.सफाई कामगारांच्या वाट्याला आलेल्या स्थितीचा मागोवा घेण्याचा त्यांचा निर्धार पक्का झाला. आणी उभे राहिले सफाई कामगारांचे न्यायासाठीचे, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठीचे संघर्ष अभियान! 

कार्यकर्ते कामाला लागले. कचऱ्याच्या गाडीला गाठायचे. कामगारांसोबत प्रवास करायचा. कामगारांना बोलायला वेळही नसे. ते धुडकावून लावत तरीही त्यांना बोलते करायचे. जवळजवळ १० महिने ही कचरा गाडीवरची भटकंती सुरू राहिली. सफाई कामगारांच्या वाट्याला आलेल्या हलाखीपूर्ण जीवनाचे पदर उलगडत गेले. महात्मा गांधीनी ज्यांना हरिजन म्हटले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना शोषणमुक्त करून प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून आयुष्य वेचले त्या दलित समाजाच्या वाट्याला सफाईचे काम आले आहे व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ६० वर्षे उलटून गेल्यावरही सफाईच्या कामामधे १००% असलेल्या मागास जातींच्या पाठचा शोषणाचा ससेमिरा थांबलेला नाही ह्या भयानक सत्याला त्यांना सामोरे जावे लागले. मुंबई महानगरपालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर कामगाराला 'पिण्याचे पाणी' मिळायला हवे ह्या मागणीसाठी २ दिवसाचे उपोषण करावे लागले. 'जो शहर स्वच्छ ठेवतो त्या सफाई कामगाराला प्यायला पाणी नाही' वर्तमानपत्रांनी मथळे दिले. आयुक्त गोखलेनी हे कामगार कंत्राटदारांचे, आमचे नव्हेत परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी देतो असे सांगून ४८ तासात सिंटेक्सच्या टाक्या बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. ह्या पाण्याने, कामगारांच्या तोवर दबलेल्या, दडपलेल्या आवाजामधे न्यायहक्कांसाठी लढण्याचा आत्मविश्वास रुजवला. १५ आॅगस्टला भरपगारी रजा हवी ह्या व इतर मागण्यांकरिता कामगारांनी मंत्रालयावर चड्डी-बनियन मोर्चा नेला. नगरविकास राज्यमंत्र्यांनी कामगारांच्या कष्टप्रद परिस्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केलं व १५ आॅगस्टच्या सुट्टीबरोबरच कामगारांना रेनकोट व गमबूट देण्याचे आदेश दिले.  आजवर अन्याय निमूटपणे सहन करणे अंगवळणी पडलेले कामगार आता लढून हक्क मिळवण्याची भाषा बोलू लागले. राजाराम यादव ह्या कंत्राटी सफाई कामगाराचा अपघाती मृत्यू झाला परंतु ' हा आमचा कामगार नाही व तो आमच्या नोकरीत नाही अशी भूमिका घेत मुंबई महापालिकेने व कंत्राटदाराने कानावर हात ठेवले. मृत राजारामचे कुटुंब उघड्यावर पडले. कामगार संतप्त झाले. राजाराम यादवाचा मृतदेह त्यांनी महापालिकेच्या दरवाजावर नेऊन ठेवला. पण यादव कुटुंबियांच्या आक्रोशाने महापालिका अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर काही फुटला नाही. ही लढाई आता रस्त्यावर नव्हे तर न्यायालयामधेच लढावी लागेल ह्याची खूणगाठ बांधून कार्यकर्ते कामाला लागले. मोठे आव्हान होते ते कामगारांचे अस्तित्व सिध्द करण्याचे! हजेरी कार्ड नाही, काम करीत असल्याची नोंद नाही, किती दिवस, किती वर्षे काम केले याचा पुरावा नाही, पगाराची चिठ्ठी मिळत नाही. प्राॅव्हीडंट फंड, बोनस, ग्रॅच्युईटी हे शब्द कामगाराच्या कधीही कानावर पडलेले नाहीत. अशा परिस्थितीमधे हे कामगार मुंबई महापालिकेचे कंत्राटी सफाई कामगार म्हणून सफाईचे काम करतात हे मान्य करण्यास नकार देणाऱ्या पालिकेला उघडे पाडणेही आवश्यक होते. आता लढायचं! हा निर्धार करून सफाई कामगारांच्या 'कचरा वाहतूक श्रमिक संघ' ह्या युनियनची स्थापना झाली. ह्या संघटनेच्या वतीने सफाई कामगारांकरिता वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले गेले. महापालिकेच्याच रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी सेवावृत्तीने सुमारे १५०० कामगारांची तपासणी केली. बहुसंख्य कामगार त्वचारोगाने व अन्य आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यांच्याकरिता योग्य उपचारांची व्यवस्था केली गेली. ह्या मुळे प्रथमच कामगारांचे नांव, रहाण्याचा पत्ता, कामाचे ठिकाण, कंत्राटदारांचे नांव, आदिंबाबतचे 'पहिलेवहिले ' रेकॉर्ड तयार झाले. 



मुंबई महानगरपालिकेच्या ह्या कंत्राटी सफाई कामगारांचा संघर्ष उच्च न्यायालयामधे पोहोचला. शहरातील सफाईचे काम हे कायमस्वरूपी असून ती महापालिकेची वैधानिक जबाबदारी आहे म्हणून हे कंत्राटी पध्दतीवर सफाई कामगारांकडून करून घेणेच मुळी बेकायदेशीर आहे हे मा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यांत आले. कंत्राटी सफाई कामगार नेमण्यासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटी कामगार कायद्याखाली नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले नाही तसेच कंत्राटदारांकडेही कंत्राटी कामगारांकडून काम करून घेण्यास आवश्यक लायसन्सही नाही याकडेही मा उच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यांत आले. मा. न्यायमूर्ती श्रीकृष्ण ह्यांनी कामगारांवरील अन्यायाची गंभीर दखल घेतली व मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायम करून कंत्राटी पध्दत संपुष्टांत आणण्याचे आदेश दिले.  कंत्राटी सफाई कामगारांच्या जिवावर गब्बर झालेल्या कंत्राटदारांच्या पाठीराख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे मानवणारे नव्हते. त्याच सुमारास, देशातील महानगरांमधे घन कचरा व्यवस्थापन होत नसून केवळ कचरा गोळा करून एका ठिकाणी जमा केला जातो व म्हणून योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभी करण्याचे आदेश  केंद्र सरकारला दिले जावेत अशी याचिका बंगलोर स्थित अलमित्रा पटेल ह्या महिलेने सर्वोच्च न्यायालयासमोर केली. सर्वोच्च न्यायालयाने ह्या प्रकरणी देशातील सर्वच महानगरपालिकांमधील घन कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी कलकत्ता महानगरपालिकेचे आयुक्त  बर्मन ह्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ह्या प्रकरणाचा लाभ घेऊन मुंबई महापालिकेने उच्च न्यायलयाचा कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय टांगणीवर ठेवला.दलित व कामगारांबाबत आकस बाळगणाऱ्या 'बर्मन समितीने' कंत्राटी सफाई कामगार पध्दतीला मान्यता द्यावी तसेच सफाई कामगारांना 'दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यातून' वगळण्यांत यावे अशी अजब शिफारस करणारा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. अहवालामधे घन कचरा व्यवस्थापनाबाबत काही योग्य शिफारशींचाही समावेश होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घन कचरा व्यवस्थापनाबाबतच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून कंत्राटी सफाई कामगारांचे शोषण पुढे सुरू ठेवण्याचा घाट घालण्यात आला. हवालदिल झालेल्या कचरा वाहतूक श्रमिक संघाने न्यायासाठी सर्व राजकीय पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली. काॅंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ह्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिले. 'मनुस्मृतीने गांवकुसाबाहेर ठेवलेल्यांना आता कायद्याबाहेर ठेवणार कां?" असा प्रश्न भेटीसाठी गेलेल्या प्रतिनिधीनी विचारला. सोनिया गांधी यांनी कंत्राटी सफाई कामगारांची समस्या समजून घेऊन, मुंबई महापालिकेतील भ्रष्ट नोकरशाही व कंत्राटदार लाॅबीची पाठराखण करणाऱ्या स्वपक्षीय सरकारला कानपिचक्या दिल्या. एका आठवड्याच्या आत सरकार हलले व तडजोडीला तयार झाले. १२०० कंत्राटी सफाई कामगार महापालिकेच्या नोकरीत कायम झाले. कचरा वाहतूक श्रमिक संघाने सफाई कामगारांसाठी मिळवलेले हे अभूतपूर्व यश होते. परंतु आता झारीतील शुक्राचार्यांचे पित्त मात्र खवळले होते. हैद्राबादमधे कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन, प्राॅव्हीडंट फंड, ग्रॅच्युईटी, भरपगारी रजा ह्यापासून वंचित ठेवून कंत्राटदारांचे व त्याचबरोबर नोकरशहांचेही उखळ पांढऱ्या करणाऱ्या युक्त्यांना यश लाभले होते. आंध्रमधे चंद्राबाबू नायडू सरकारने कामगार कायद्याच्या कक्षेत राहूनही बिनदिक्कतपणे सफाई कामगारांचे शोषण कसे करता येईल याचा वस्तुपाठच घालून दिला. 'हैद्राबाद पॅटर्न' ह्या नांवान ही पध्दत मुंबई महानगरपालिकेने २००४ साली तत्परतेने स्वीकारली. कंत्राटी कामगार कायद्यातील तरतुदींनुसार एका कंत्राटदाराकडे २० वा त्यापेक्षा जास्त कामगार असल्यास, कामगारांना कायद्याप्रमाणे द्याव्या लागणाऱ्या सर्व सवलती व लाभ देणे टाळण्यासाठीच हा 'हैद्राबाद पॅटर्न' स्वीकारला गेला होता. ह्या पॅटर्न नुसार १८ कामगारांचे एक अशी ३५० युनिट तयार केली गेली व ६००० कंत्राटी सफाई कामगार नेमले गेले. प्रत्येक युनिटमधे २० पेक्षा कमी कामगार नेमून त्या अनुषंगाने कंत्राटी कामगारांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे हे कारस्थान होते. कामगारांना सवलती व लाभ देण्यापासून सूट मिळावी यासाठी कायद्यांतून पळवाट काढणारा डाव रचला गेला. कामगार कायद्यानुसार २४० दिवस भरणाऱ्या कामगारास नोकरीत कायम करावे लागते. हे टाळण्यासाठी ७ महिन्यांचे म्हणजे २१० दिवसांचेच कंत्राट देण्याची शक्कल लढविण्यांत आली.  एक कंत्राट संपले की नव्याने दुसरे कंत्राट, म्हणजे कामगारांना कायम करण्याची बला टळली, अशी महापालिकेतील नोकरशहांची अक्कलहुशारी होती. कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित  ठेवणाऱ्या षडयंत्राला नांवही गोंडस दिले गेले - 'जनसहभागासह स्वच्छ शहर अभियान' ! ह्या अभियानाची सफाई कंत्राटे मग 'स्वयंसेवी संस्थांना ' दिली जाऊ लागली. लोकप्रतिनिधींच्या व नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी लगोलग 'स्वयंसेवी संस्था' स्थापन केल्या व हे कार्यकर्ते 'कंत्राटदार' झाले. त्यांना अशासकीय स्वयंसेवी संस्था व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना 'स्वयंसेवक' संबोधण्यांत येऊ लागले. गरज पडल्यास न्याययंत्रणेच्या डोळ्यांत धूळ फेकून कायद्याच्या कचाट्यातून सुटका व्हावी याची ही तयारी होती. कामगारांचा पगार १२७ रुपये रोज  व एकूण पगारावर ८% अनुदान अशा निश्चित रकमेची कंत्राटे देण्यांत आली. कामगाराचा रोज जरी १२७ रू ठरला तरी कामगारांच्या हाती रु ६० ते ७० टिकवले जाऊ लागले. काही कंत्राटदारांनी तर १८ माणसांऐवजी १२- १५ माणसेच कामाला लावून उरलेल्या जागांवर आपल्याच कुटुंबातील माणसे नांवापुरेशी दाखवून नफा कमवायचा नवा फंडा शोधून काढला. महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांचा घपला होऊ लागला. सफाई कामगार कमी पगारात राबताना पिचून जाऊ लागला मात्र अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना 'हैद्राबाद पॅटर्नच्या रूपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी गवसली. एव्हढ्यांतच सफाई कामगारांच्या संघर्षाला बळ देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांची व कंत्राटदारांची झोप उडवणारी घटना घडली. १९९७ साली सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना महापालिकेने मुंबई शहर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. ही स्वच्छता मोहीम संपल्यानंतर त्या साठी नेमलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना पालिकेने कामावरून कमी केले होते. ह्या ५८० कामगारांना पालिकेने कामावर ठेवून घ्यावे ह्या करिता कचरा वाहतूक श्रमिक संघाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'जेंव्हा मुंबई महापालिकेला सफाई कामगारांची आवश्यकता भासेल तेंव्हा ह्या कामगारांना प्रथम कामावर घ्यावे असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिला होता. आता २००४ साली हैद्राबाद पॅटर्न स्वीकारून, ह्या १९९७ सालातील ५८० कामगारांना कामावर न घेता, सुमारे ६००० कंत्राटी कामगारांना महापालिकेने नेमल्याबरोबर कचरा वाहतूक श्रमिक संघटनेने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. महापालिकेला वेळीच शहाणपण सुचले व ह्या ५८० कामगारांपैकी प्रत्येकी २ कामगारांना प्रत्येक कंत्राटदाराने स्वत:मार्फत नेमावे अशी सूचना कंत्राटदारांना म्हणजेच हैद्राबाद पॅटर्ननुसार सफाईचे काम सोपविलेल्या स्वयंसेवी संस्थांना करण्यांत आली. संघटनेच्या सभासद कामगारांना शहरभर विखुरलेल्या स्थितीमधे ठेवून संघटना मोडीत काढण्याच्या विचाराने हे करण्यांत आले होते. परंतु 'केला तुका आणि झाला माका' अशी वेळ महापालिकेवर आली. युनियनचे सभासद असलेल्या ह्या कामगारांना निश्चित केलेला रू १२७/- पूर्ण देणे कंत्राटदारांना भाग पडले. कंत्राटदारांच्या इतर कामगारांची मात्र ६० ते ७० रुपयांपर्यंत रोजावर बोळवण होत असे. कचरा वाहतूक श्रमिक संघाने आपल्याला हा किमान वेतनाचा हक्क मिळवून दिला हे युनियनचे सभासद  कामगार त्यांना अभिमानाने सांगत. किमान वेतन हा आपला अधिकार आहे व आपण तो मिळवूच हा विश्वास कामगारांमधे निर्माण झाला. २७०० कामगार युनियनचे सभासद झाले. ह्या कामगारांनाही किमान वेतन मिळावे म्हणून कचरा वाहतूक श्रमिक संघाने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने कामगारांना पूर्ण किमान वेतन देण्याचे आदेश दिले. प्रत्येक कामगारामागे, त्याच्या पगारातील रू २०००/- प्रमाणे २७०० कामगारांचे हक्काचे ५४ लाख रू कंत्राटदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांमधे दरमहा वाटून घेतले जात. ह्या भ्रष्टाचाराला आळा घालणारा हा न्यायालयाचा आदेश म्हणजे युनियनचे मोठेच यश होते. कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे
हे मान्य करावयास लावले. परंतु तेही न देण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या  लढविण्यास कंत्राटदारांनी सुरूवात केली. किमान वेतन मिळाल्याच्या पावतीवर सही घ्यायची व हातात वेतन मात्र कमी द्यायचे असे प्रकार युनियनच्या निदर्शनास आले. हे रोखण्यासाठी कामगारांना त्यांचे वेतन चेकने देण्यांत यावे अशी मागणी युनियनने केली व ती प्रशासनाने मान्य करून तशा सूचनाही कंत्राटदारांना दिल्या. परंतु कंत्राटदारांनी शक्कल लढवून त्यावरही मात केली. कामगारांच्या नावे बेअरर चेक लिहून कामगारांना पूर्ण किमान वेतन चेकने दिल्याचा आभास निर्माण केला जाऊ लागला. पुन्हा एकदा कचरा वाहतूक श्रमिक संघाने सफाई कामगारांना त्यांच्या कष्टाचे किमान वेतन  द्यायचेच नाही असा चंग बांधलेल्या कंत्राटदारांचे व त्यांच्या पाठीराख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडले. कामगारांची बॅंक पासबुके प्रशासनाकडे सादर करण्यांत आली व प्रशासनाने प्रत्येक कामगाराचे वेतन त्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले. कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे ह्याची खबरदारी कचरा वाहतूक श्रमिक संघ आता घेत आहे.

'कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या' माध्यमातून कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सुरू केलेला संघर्ष आता यश मिळवत पुढे चालला आहे. मुंबई महापालिकेच्या २७०० कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नाही ह्या संघाच्या तक्रारीबद्दल कामगार आयुक्त कार्यालयाने दिलेल्या अहवालात तर ह्या कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या कायम कामगारांइतकेच वेतन ' समान काम, समान वेतन' ह्या कायद्यातील तरतुदींनुसार मिळायला हवे असे नमूद करण्यांत आले आहे. या पुढचा संघर्ष किमान वेतन नव्हे तर कायम कामगारांइतकेच म्हणजे 'समान वेतन' मिळविण्यासाठी करायचा आहे याची जाणीव सफाई कामगारांना झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर व इतर महापालिका व नगरपालिकांमधूनही  कंत्राटी सफाई कामगारांच्या हक्कांची पायमल्ली सुरू आहे व ह्या कामगारांचे किमान वेतनासह इतर हक्क मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन' ही सफाई कामगारांची राज्यव्यापी संघटना जोमाने कार्यरत  झाली आहे. कंत्राटी सफाई कामगारांनी एकजुटीने चालवलेला हा संघर्ष महाराष्ट्रांतील इतर कामगारांनाही प्रेरणा देणारा ठरेल हे निश्चित!