Monday, April 30, 2012

चिकित्सा योग्य पण तांतडीने उपचार आवश्यक

राहुल गांधीनी महाराष्ट्र्ातील काँग्रेस पक्ष संघटनेला जडलेल्या विविध व्याधींची योग्य चिकित्सा केली. ज्यांचेकडे पक्षाचे पालकत्व आहे त्यांचे कडून पालनपोषण व्यवस्थित होत नसल्यानेच मुडदुस जडला असावा याची खात्रीही त्याना पटली असावी. पक्ष व सरकार यामधे समन्वय राहीलेला नसल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारमधे असलेल्यांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे या बाबतची खंत त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाली. पक्षामधे काम करणार्याना डावलले जात आहे हे सांगतानाच त्यांनी पक्षातल्यांकडूनच पक्षाचा पराभव केला जात आहे हे निरिक्षणही त्यांनी नोंदवले.
उत्तर प्रदेश मधे स्वतः केलेल्या प्रचंड मेहनतीनंतरही अपयश पदरी पडलेल्या राहुलनी जे विश्लेषण पराभवानंतर केले जवळपास तसाच अभिप्राय त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांना अजून पुरती दोन वर्षें बाकी असताना व्यक्त केला हे विशेष! राहुलनी केलेली ही नाडीपरीक्षा जरी योग्य असली तरी या व्याधींवर इलाज काय करणार हे मात्र राहुलनी स्पष्ट केले नाही. वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठ्ेने राबणारे बंडासाठी का उभे ठाकतात व पक्षाच्या पराभवास कारणीभूत कां ठरतात हा प्रश्न स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा बळी देणार्याना विचारण्याचे राहुलनी टाळले. परिणामी कार्यकर्ते हवालदिल झाले व पक्षाच्या आजच्या स्थितीला जबाबदार नेत्यांनी सुटकेचे निश्वास सोडले.
राहुलजी रोगाचे निदान योग्य केलेत आता तांतडीने उपचार करा व आवश्यकता ध्यानांत घेऊन शस्त्रक्रिया करा अन्यथा राजाचा पोपट मृत्युपंथाला लागल्याचे सांगण्याचे धारिष्ट्य कोण करणार?