Monday, May 5, 2014

रोखावेच लागेल आता मोरारजीच्या वारसांना!

        

                                              

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडल्या. अब की बार...म्हणत कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने गुजराती बांधव मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसले. मतदानाच्या सुट्टीला जोडून, आपल्या धंदा-व्यापारातून वेळ काढून गुजराती व्यापारी मुंबई बाहेर सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडत असत. लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर येथली रिसाॅर्टस् तुडुंब गर्दीने भरून वाहत. ही गर्दी प्रामुख्याने गुजराती भाषिकांची असे. ह्या वेळी मात्र अघटित घडले. ह्या सहलीच्या ठिकाणांकडे गुर्जर बंधूंची पावले वळलीच नाहीत. 'आपडा नरेनभाई माटे' सहलीच्या आनंदाचा त्याग करून मतदानाचे पवित्र कर्तव्य त्यानी पार पाडले. दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचा ऊमेदवार शिवसेनेचा असताना,मतदान केंद्राच्या बाहेर प्रदर्शित केलेल्या डमी मतपत्रिकेवर 'कमळ' कां दिसत नाही? हा प्रश्न अनेक गुजराती 'नवमतदार' विचारत होते. मुंबईतल्या मोदींच्या सभेतही ह्याच उत्साहाचे दर्शन घडले होते. कधीही कोणत्याही जाहीर राजकीय कार्यक्रमांना सहसा उपस्थित न रहणार्या बेपारीनी, नरेनभाईंच्या जाहीर सभेला आवर्जून उपस्थिति लावली होती. अब की बार, मोदी सरकार आणण्यासाठी करोडोंच्या थैल्या मोकळ्या करणार्या ह्या मोदी बंधूंसाठी खास शामियाना उभारून बसण्याची आरामदायी व्यवस्थाही करण्यांत आली होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार ह्यांनी आपले सारे कलाकौशल्य पणाला लावून भरलेल्या मैदानातली मराठी मायभगिनी-बांधवांची गर्दी मात्र कडक उन्हामधे अंगाची काहिली होत बेजार होऊन बसली होती. 

निवडणुकीदरम्यानचा 'नरेनभाई माटे, आपडा माणस माटे चा' उत्साह, मराठी माणसाना दिली गेलेली दुय्यम वागणूक ह्याच्या प्रतिक्रिया आता निवडणूक झाल्यानंतर उमटू लागल्या आहेत. मोदी जर चुकून माकून पंतप्रधानपदी विराजमान झाले तर मुंबई मधे गुजराती अधिकच वर्चस्व गाजवू लागतील अशी भीती काही राजकीय पक्षांना व नेत्यानाच नव्हे तर सामान्य मराठी माणसालाही वाटू लागली आहे. मुंबईतील मालाड,़कांदीवली, बोरीवली, घाटकोपर पााठोपाठ आता परळ-लालबाग, गिरगांव, दादर-शिवाजीपार्क, पार्ले-अंधेरी आदी मराठी वस्त्यावरील, मराठी ठसा पुसला जात आहे ह्याचा सल प्रत्येक अस्सल मराठी माणसाच्या मनात आहे हे नाकारून कसे चालेल? पुढच्या पालिका निवडणुकांमधे ह्या भागांमधून गुजराती भाषिक नगरसेवक निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको! मराठी माणसाच्या नांवाने राजकारण करणार्यांना हे कळत नाही असे नाही पण वळतही नाही असा अनुभव येत असल्याने, राज्यकर्ते मराठी परंतु मराठी जनतेची स्थिती मात्र 'असुनी नाथ मी अनाथ' अशी झालेली आहे.

मराठी जनांच्या मनामधे गुजरातींबद्दलची अढी व गुजराथ्यांच्या मनामधे मराठींबद्दल असलेला आकस आजचा नाही. परस्परांबद्लच्या ह्या भावनांचे मूळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामधे आहे. गुजरात धार्जिण्या नेत्यांचा व उद्योगपतींचा मुंबई केंद्रशासित करण्याचा कुटिल डाव उधळून लावण्यासाठी अाचार्य अत्रे, एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे काॅ. डांगे ह्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामधे १०५ हुतात्म्यांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले. मराठी मनावर झालेल्या ह्या घावाची जखम आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही पूर्णपणे भरलेली नाही. मुंबई मधे व्यापार-धंद्यामधे करोडोंची गुंतवणूक करणार्या  शेठियांच्या मनामधे देखिल, ज्या मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात आहेत ती मुंबई आपण राजकीयदृष्ट्या गमावल्याचे शल्य आजही ठसठसत असते. ही खदखद, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची' अशा घोषणांतून बाहेर पडते. गुजरातवर ओढवलेले नैसर्गिक संकट असो वा मोदींची पंतप्रधान होण्याची आकांक्षा, थैल्या घेऊन धावत सुटणारे ज्या महाराष्ट्रामधे अमाप संपत्ती मिळवतात त्याच महाराष्ट्रावरील आपत्ती  प्रसंगी हात आखडता घेतात हे पाहून मराठी माणसांचे पित्त खवळले तर त्यांचे काय चुकले?

आज मराठी माणसासमोर मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाबरोबरच मराठी संस्कृतीच्या रक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.  गिरणगांवाच्या छाताडावर उभे राहिलेल्या ऊत्तुंग टॅावर खाली आपले खोडकर बालपण, तारूण्यातला जोश गाडला गेला आहे ह्या जाणीवेने तो अस्वस्थ आहे. ज्या गिरण्या-कारखान्यांमधे आपण, आपल्या बापजाद्यांनी घाम गाळला तेथे उभ्या राहिलेल्या भव्य आलिशान माॅल मधे प्रवेश करताना त्याची छाती दडपून जाते. जिवाभावाचे नाते ज्यांच्याशी जुळले ती मैदाने, त्या शाळा कधी गायब झाल्या ते त्याला कळले देखिल नाही. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर, ज्यूस च्या स्टाॅलसमोर गाड्यांमधून येणार्या धनिक-वणिक बाळांचे अड्डे जमू लागले. ह्या गर्दीमधे सामान्य मराठी माणसाला बुजल्यासारखे होते. बर्याचदा गृहनिर्माण वसाहतींमधे वा उरल्यासुरल्या चाळींमधे मराठी माणूस अल्पसंख्यक होऊ लागला आहे. वसाहतीमधला सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रामधला दांडिया यांची एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली आहे. आपल्या वसाहतींमधे मराठी माणसाना जागा विकत घेता येऊ नयेत याचे 'मांसाहारीना मज्जाव करणारे' अलिखित नियम कठोरपणे पाळणारे मात्र आपल्या भाईबंदानाच जागा घेता यावे ह्याचे डाव रचत आहेत. परिस्थितीच्या रेट्याने किंवा चाळमालकाच्या दबावाने ह्याच मंडळीना जागा विकणे मराठी माणसाला भाग पडत आहे. आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवावेत अशा मागण्याबरोबरच, आपल्या वसाहतीजवळचा मासळी बाज़ार हटविला जावा अशी कुजबूजही ह्या पक्क़्या शाकाहारीनी सुरू केली आहे.  गिरगांव मधील 'अनंताश्रम' ह्या सुप्रसिध्द परवडणार्या खानावळी पाठोपाठ लालबागचे 'क्षीरसागर', 'दत्त बोर्डींग' ह्या सारखी मांसाहारींची आवडती ठिकाणे, ह्या परिसरांतील मांस-मच्छी न खाणार्या वाढत्या लोकसंख्येमुळे काळाच्या उदरांत गडप होणार नाहीत ना? याची चिंताही मांसाहार प्रेमीना सतावू लागली आहे. सेनाप्रमुखांनी आवाज दिला तेंव्हा कोहिनूर मधे सोंगाड्या प्रदर्शित झाला हा इतिहास मराठी माणूस विसरलेला नाही. आज 'भारतमाता' चा घास घ्यायला टपलेल्यांपासून कधीही धोका होऊ शकतो ह्याची जाणीव मराठी चित्रपट रसिकाला आहे. ह्या सगळ्याला धनदांडग्या मुजोरीचा दर्प असल्याची  मराठी माणसाची खात्री पटली आहे. 

मराठी माणसाची ही अस्वस्थता समजून घेण्यामधे मराठीचा ठेका घेणारे राजकीय पक्ष व नेते दुर्दैवाने कमी पडत आहेत वा येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांतील मतांच्या हिशेबांनी त्यांचे ओठ शिवून टाकले आहेत. एखाद्याने ह्या मराठी संस्कृतीवर छुपा हल्ला चढविणार्या प्रवृतींशी 'सामना' करण्याचा रिकामटेकडा उद्योग केलाच तर त्याला त्याचे वरिष्ठ नेतेच तोंडघशी पाडत आहेत. ६० च्या दशकात कारकुनी करणार्या दक्षिण भारतीयांविरोधात 'बजाव पुंगी हटाव लुंगी' चा नारा देणार्या व ७७सालीच ह्या 'मोरारजीच्या वारसांची' पावले ओळखून, त्यांना ठाकरी भाषेत समज देणार्या शिवसेनाप्रमुखांचे वारसदार,आज ह्या धनशक्तीसमोर हतबल झाल्याचे विदारक चित्र पाहून मायमराठीच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत. आता पुन्हा पेटून उठावे लागेल ते मराठी माणसालाच!  आपल्या चुकांचे व उणीवांचे आत्मपरिक्षण करून, आपल्या एकजुटीची वज्रमूठ उगारण्यांत जर आम्ही मराठी कमी पडलो तर  रक्त सांडून मिळविलेली मुंबई, महाराष्ट्राला गमवावी लागेल. अब की बार जर मोदी सरकार आलेच तर हे घडवण्याची कारस्थाने रचली जातील म्हणूनच आता मोरारजीच्या वारसांना रोखावेच लागेल मुंबईतली मराठमोळी संस्कृती टिकविण्यासाठी!

अजित सावंत
मो. ९८२००६९०४६
ajitsawant11@yahoo.com