Thursday, August 23, 2012

काळ सोकावतो आहे...

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून श्री अरूप पटनायक यांची बढतीच्या रुपाने बदली झाली.बढती म्हणा वा बदली, ११ आॅगस्ट ची दंगल हाताळण्यामधे आलेल्या अपयशाचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडले आहे हे निश्चित! ११ आॅगस्ट च्या दंगलीमुळे केवळ पोलीसांचे मनोधैर्यच खचले असे नव्हे तर जनतेच्या मनामधे असलेला पोलीसांवरचा विश्वासही डगमगू लागला. अरूप पटनायक यांच्या ऊचलबांगडीमुळे प्रश्न सुटल्याच्या भ्रमात राज्यकर्ते असतील, विरोधी पक्ष व तथाकथित महाराष्ट्रधर्मिय मोठा विजय मिळविल्याच्या आनंदात स्वत:चीच पाठ थोपटून घेतील. प्रसार माध्यमेही नव्या-जुन्या आयुक्तांच्या तसेच सरकारच्या व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांचा मागोवा घेत ब्रेकिंग न्यूज चा शोध घेण्यामधे मग्न राहतील. हे सारे भानावर येतील तेंव्हा पटावरची प्यादी हलवून प्रश्न सुटलेले नसून अधिक नवे प्रश्न सामोरे आलेले दिसतील़. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो आहे हीच खरी चिंता आहे.
"मेरे एक हाथ में जूता और दूसरे हाथ में गीता है, जिसको जो चाहीए उस को वो ले ले" असे ठणकावून सांगणार्या पटनायक यांनी स्वतःच्या कर्तव्यकठोरतेचा आदर्श निर्माण केला होता हे त्यांचा राजीनामा मागणार्यानाही मान्य करावेच लागेल. मुंबईतील धनदांडग्यांच्या चाळ्यांना चाप लावणार्या ढोबळेंच्या पाठीशी ते ठामपणे ऊभे राहीले व जनतेच्या कौतुकास पात्र ठरले. ११ आॅगस्ट ची दंगल हाताळण्यामधे पटनायक यांनी अकार्यक्षमतेचे दर्शन घडवले की समयसूचकता दाखवून स्वतःची व पोलीस दलाचीही प्रतिमा पणाला लावून संयमाने परिस्थिती हाताळली व मुंबई पेटविण्याचा डाव ऊधळून लावला? याच्या मुळाशी जाण्याची खरे तर आवश्यकता होती.परंतु धार्मिक विद्वेषाच्या पायावरच ज्यांचे राजकारण आधारलेले आहे त्यांना संधी दवडायची नव्हती व आपसातील कुरघोडीच्या राजकारणामधे, वेळही गमवायचा नव्हता. मुंबई जळली काय अन् वाचली काय याचे भान ह्या तोंडाळ नेत्यांना कुठे राहीले होते!
ही दंगल घडवली कोणी? याचा शोध घेणे आता सुरु आहे. दंगलीमधे दुखावलेल्या ड्रग माफियांचा हात आहे येथपासून ते परदेशातून सूत्रे हलल्याचे धागेदोरे पोलीसांच्या हाताला लागत आहेत. राजकीय स्पर्धेपोटी शह काटशहाचे राजकारण, मुरब्बी नेत्यांनी रचल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे जर घडले असेल तर पटनायकांना दिलेली शिक्षा म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असे म्हणावे लागेल.
नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी 'मेरी वर्दीही मेरा धर्म है' असे सांगून पोलीसांचे मनोधैर्य उंचावण्याच्या अावश्यकतेवर जोर दिला आहें. परंतु आल्याआल्याच पटनायकांचे स्पेशल स्क्वाॅड बंद करण्याचा ऊतावीळपणाही केला आहे. कोणतीही माहीती न घेता घेतलेल्या या आगंतुक निर्णयाने मुंबईतील समाजद्रोही शक्तींचे तर फावणार नाही ना याची खातरजमा होणे जरुरीचे होते. कोणत्या परिस्थितीमधे कोणती आव्हाने आपल्यासमोर आहेत याचे आकलन सत्यपाल सिंह यांच्यासारख्या अनुभवी अधिकार्याला निश्चितच असणार अाहे, परंतु काळ आता सोकावलेला आहे याचे भान मात्र त्यांनी सदैव राखावयास हवे.

No comments:

Post a Comment