Sunday, November 29, 2015

समतोल 'घर वापसी'

'समतोल फाउंडेशन' ही संस्था स्टेशन परिसरातील मुलांशी संपर्क साधून व त्यांची कौटुंबिक माहीती मिळवून त्यांचे समुपदेशन करते. देशाच्या विविध भागातून आलेली ही ७ ते १४ वयोगटातील मुले बहुधा घर सोडून आलेली वा हरवलेली मुले असतात. त्यांना पुन्हा पालकांकडे पोहोचविणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आजवर सुमारे ५२०० मुलांना पुन्हा आपल्या घरी, आपल्या कुटुंबामधे पाठविण्याचे महत्वाचे काम 'समतोल फाउंडेशन' व संस्थापक विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे हे कौतुकास्पद आहे. घरापासून व कुटुंबापासून नाते तुटलेल्या ह्या मुलांनी गुन्हेगारीपासून, अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून व लैंगिक शोषणापासून दूर रहावे ह्या साठी ही संस्था दक्ष असते. आज ह्या संस्थेतील मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून ह्या मुलांना पालकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम (मिलन समारोह) हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, JIO मालाड, व स्ट्रीट चिल्ड्रेन्स् फाउंडेशन आणि समतोल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यांत आला होता. ह्या हृद्य सोहळ्यास माजी न्यायमूर्ती कमल किशोर तातेड व ज्येष्ठ सिनेअभिनेते सुरेश ओबेराॅय, पोलीस लांचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख किशोर जाधव हे उपस्थित होते. मुलांच्या शोधात वणवण फिरणाऱ्या मातापित्यांची अनेक महिन्यानंतर मुलांशी होणाऱ्या भेटीचे दृश्य मन हेलावणारे होते. घर सोडून आलेली मुले आईच्या कुशीत शिरून हमसीहमशी रडताना दिसत होती. आई वा बाप मारतात म्हणून घर सोडून आलेल्या मुलांना पुन्हा मायेची आस लागली होती व आई व वडिलही पुन्हा मारणार नाही याची खात्री पाणावलेल्या डोळ्यांनी देत होते.समाजातील दानशूर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात 'समतोल फाउंडेशन' ला सहाय्य करण्यास सरसावलेले असतात.ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमामधे सहभागी होण्याचा आनंद ज्यांच्यामुळे लाभला त्या समतोल फाउंडेशन चे संस्थापक ह्यांना धन्यवाद व त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा! ह्या स्तुत्य उपक्रमास आपलाही मदतीचा हात हवा आहे. संपर्क : विजय जाधव :98-92-961124



No comments:

Post a Comment