Tuesday, November 20, 2012

महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना हे बाळासाहेबांचे स्मारक!

बाळासाहेबांच्या महायात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या लाखोंची गर्दी लोटली. हे सारे फक्त शिवसैनिक नव्हते तर सर्व पक्षांचे, विचारांचे, धर्म व जातींचे बाळासाहेबांवर प्रेम करणारेही होते. त्यांत भक्त होते,अनुयायी होते,चाहते होते,मित्र होते आणी आयुष्यभर बाळासाहेबांसोबत राजकीय वैर असलेले शत्रूही होते. वैर्यांनीही प्रेम करावं असा 'दिलदार माणूस' होते बाळासाहेब! तरी देखिल बाळासाहेबांची चिता पूर्णपणे विझतही नाही तोवर बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद सुरु व्हावा ही घटना दुर्दैवी आहे़. म्हणूनच हा वाद सर्व संबंधितंानी ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे. त्याकरिता दोन्ही बाजूंनी समंजसपणा दाखवून महाराष्ट्राच्या महान नेत्याचे उचित व प्रेरणादायी स्मारक एक नव्हे तर अनेक कशी होतील याची योजना आखावयास हवी.

बाळासाहेबांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंडच! शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर जर बांधकाम स्वरूपात स्मारक शक्य नसेल तर बाळासाहेबांच्या दैवताजवळच 'धगधगते यज्ञकुंड' तयार करून तेथे समिधा अर्पण करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे उचित ठरेल . याकरिता कमी जागा लागेल व मैदान प्रेमीनाही दिलासा मिळेल, अर्थात् सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच ! तसे म्हटले तर ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या गर्जना घुमत असत , त्या जिवाचा कान करून ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी लोटत असे ते संपूर्ण शिवतीर्थ हेच बाळासाहेबांचे खरे स्मारक! म्हणून अधिकृतपणे 'शिवतीर्थ हे नांव प्रथम जाहीर करणे ही बाळासाहेबांना खरी श्रध्दांजली!

मुंबईमध्ये बाळासाहेबांचे अतिभव्य स्मारक व्हावे ही केवळ शिवसैनिकांची नव्हे तर सर्वांचीच अगदी शासनाचीही इच्छा अाहे. म्हणूनच दादर भागातच हे स्मारक ऊभे करण्या संबंधीही विचार करता येऊ शकेल. इंदू मिलच्या बहुचर्चित जमिनीवर डाॅ बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब यांचे एकत्रितपणे स्मारक झाल्यास एक आगळावेगळा समतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल. याचाही विचार समंजसपणे करावयास हरकत नाही.

बाळासाहेबांची स्मारके व्हावयास ज़रूर हवी परंतु खर्या अर्थाने बाळासाहेबांची स्मारके आहेत, तो मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ५५ ऊड्डाण पूल, झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची व दूरदर्शीपणाची साक्ष देत आहेत, महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणा देत आहेत. विकासाच्या अशाच भव्य दिव्य योजना हेच महाराष्ट्राच्या हिताची सदैव तळमळ जपणार्या महान नेत्याचे, खरेखुरे स्मारक होय!

No comments:

Post a Comment