Saturday, August 23, 2014

जोश जल्लोष व होश!






जोश जल्लोष होश!
 -अजित सावंत
दही हंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा म्हणून उच्च न्यायालयाने दही हंडीच्या उंचीवर २० फूटांचे बंधन आणणारे १८ वर्षाखालील बालगोविंदाना हंडीच्या थरावर जाण्यास मनाई करणारे आदेश दिले आयोजकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांच्याच विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही समंजस आयोजकांनी हंडीचा 'इव्हेंट' रद्द करून, राखून ठेवलेला  निधी सामाजिक  उपक्रमांसाठी खर्च करणार असल्याचे जाहीर करून नवा पायंडा पाडला. दही हंडी उत्सव समन्वय समितीने मात्र ह्या निर्णयाविरूध्द संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांनी तर त्यांच्या ह्या प्रिय सोहऴ्यावर गदा येत असल्याबद्दल दूरचित्रवाहिनीवरच्या चर्चेमधे आसवे गाऴली   महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जपणारा हा उत्सव संपता कामा नये अशी आक्रमक भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयामधे आपल्या उत्सव मंडळामार्फत याचिकाही दाखल केली. जीवघेण्या स्पर्धेतून लहानग्यांचे जीव धोक्यात घालणारी ही कोणती पुरोगामी परंपरा हा प्रश्न पुरोगामित्वाचा सतत उद्घोष करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही पडला नाही हे विशेष! येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन मौन स्वीकारणे त्यांनी  सोयीस्कर मानले असावे.  हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ह्यांनी मात्र  वास्तववादी भूमिका घेतली. "दही हंडी उत्सव हा आमचा पारंपारिक उत्सव बंद होता कामा नये. या वर्षीही हा उत्सव जल्लोषातच साजरा होणार मात्र जल्लोषाचा आनंद साजरा करताना जीवघेणा खेळ नको" बालगोविंदांवरच्या बंदीचे स्वागत करून ह्या सणाला इव्हेंटचे स्वरूप आणू नये असेही उध्दव यांनी म्हटले. दही हंडी, गणेशोत्सव वा नवरात्रोत्सव  आदी हिंदूंच्या सण-उत्सवांचे गेल्या काही वर्षांमधे व्यापारीकरण करून, आपआपसातील स्पर्धेतूनच आपले नेतृत्व समाजावर थोपणाऱ्या  सणांना,उत्सवांना विकृत रंग फासण्यास कळत नकळत  हातभार लावणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी लोक प्रतिनिंधीनी उध्दव यांच्या ह्या भूमिकेतून बोध घेणे अपेक्षित
 हिंदू धर्मिय हे मुळातच उत्सवप्रिय आहेत. सणवार,प्रथा-परंपरा हाच मुळी हिंदू धर्माचा गाभा आहे. हे सण उत्सव साजरे करणे, रूढी-परंपरांचे पालन करणे म्हणजेच हिंदू जीवनपध्दती होय! सण उत्सवांना हिंदू धर्मामधे जे अनन्यसाधारण महत्व आहे तसे जगातील अन्य कोणत्याही धर्मामधे नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे एकमेव कारण म्हणजे हिंदू जीवनपध्दतीमधे, प्रेम आदर, कृतज्ञता बंधुभाव, श्रध्दा विश्वास, तसेच दुष्ट अत्याचार याबद्दलची चीड ह्या बाबतचे संस्कार ह्या सण वारातूनच होत असतात. हिंदूंमधील सहिष्णुता संयम आणि एकमेकांविषयीचा जिव्हाऴा आपुलकी ह्याचे उगम स्थानही ह्या सण उत्सवामधे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रापुरेसा हिंदू सण उत्सवांचा विचार केला तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी रंगपंचमी, दही हंडी, गुढी पाडवा, मकर संक्रांत, नारळी पौर्णिमा रक्षा बंधन, नाग पंचमी, वट पौर्णिमा, बैल पोळा या दिपावलीच्या सर्वात मोठ्या सणासह, दत्त जयंती, राम नवमी, हनुमान जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सवामधे शुभ कार्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या गणपतीबाप्पांचे पूजन करून पुढे येणाऱ्या, पीक कापणी च्या हंगामासाठी, लग्न सराईच्या काळामधे शुभ कार्ये जुळुन येण्यसाठी विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेण्यसाठीच ह्या उत्सवाची योजना झाली असावी. पुढे लोकमान्य टिळकांच्या कल्पकतेमधून सामान्य जनांना संघटित करून राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. परिणामी प्रबोधनाचे मोठे काम सार्वजनिक गणेशोत्सवातून महाराष्ट्रामधे सुरू झाले. पुढे पुढे नवरात्रोत्सवही सार्वजनिकरीत्या साजरा होऊ लागला. स्त्री शक्तीचा गौरव करून दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करण्याची शक्ती स्त्री मधे आहे ह्याची कबुली देऊन ह्या आदिंशक्तीपुढे नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा  महाराष्ट्रातील जोशाने साजरा करण्याचा उत्सव! काळाच्या ओघामधे, ह्या उत्सवामधे तरूणाईला साद घालणाऱ्या 'दांडीया- गरबाने' शिरकाव केला मुंबईच्या गल्ल्या-बोळांमधे,मैदानांमधे, पटांगणांमधे रंगू लागलेल्या दांडिया गरबामधे, मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या तरूण-तरूणींबरोबरच, प्रौढांचीही पावले थिरकू लागली. जोश-जल्लोषाचे एक प्रभावी माध्यम नव्याने तयार झाले. अग्निदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सार्वजनिकरीत्या होलिकोत्सव साजरा करण्याची प्रथा गांवागावातून होतीच परंतु ह्या उत्सवामधे कुणाच्या ना कुणाच्या नांवाने सार्वजनिकरीत्या बोंब ठोकून 'शिमगा' करण्याची सूट मिळत असल्याने ह्या उत्सवाचा आनंदही  द्विगुणित होऊ लागला. जोडीने रंगपंचमी निमित्त श्री कृष्णाचा आदर्श समोर ठेवून 'रंग' खेळण्याची संधी मिळत असल्याने हा सणही तरूणामधे लोकप्रिय झाला. गेल्या दोन तीन दशकामधे, सणांचा राजा मानल्या गेलेला 'दिवाळी' चा सण सार्वजनिक दिपोत्सव म्हणून साजरा लागला आहे. त्या निमित्ताने केली जाणारी रोषणाई, तरूणांच्या कल्पकतेमधून साकारलेले रस्त्या-रस्त्यावर लटकलेले शोभिवंत कंदिल, महिलांसाठी खास आयोजित केलेल्या जाणार्या ' फराळ-पाककृती स्पर्धा', तरूणांनाही आकर्षित करणाऱ्या रांगोळी स्पर्धा  अशा कला गुणांना वाव देणार्या उपक्रमांमुळे, कलात्मकता वाढीस लागली आहे. मकर संक्रातीनिमत्ताने आयोजित केले जाणारे महिलांचे सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ ही तर महिलांसांठी एकत्र येऊन, महिलांचे प्रश्न समस्या, प्रगतीच्या संधी ह्याचा आढावा घेण्यासाठीची पर्वणीच होय! गुढी पाडव्यानिमित्त निघू लागलेल्या शिस्तबध्द नववर्ष स्वागत यात्रांमधेही आबालवृध्द महिला पारंपारिक वेषामधे मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागल्याने हिंदू रूढी परंपरांबाबतचे आकर्षण औत्सुक्य वाढीस लागत आहे. दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती ह्या सार्वजनिक रीत्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांमधे जल्लोषाला स्थान नसते केवंळ भक्ती भावाची अभिव्यक्ति हेच उद्दिष्ट असते. साईंच्या नावानेही अलिकडे 'साई - भंडारा' महोत्सव ठिकठिकाणी आयोजित करून गरीबांना अन्नदान करून परोपकाराचा सामूहिक भोजनाद्वारे समतेचा मंत्र ही जपला जातो. असे विविध सण- उत्सव  साजरे केले जातात परंपरांचे जतन केले जाते. दही हंडीचा उत्सव तर जोश, जल्लोष, आनंद,उत्साह भरून उतू चालल्यागत! सोबत तरूणाईला खुणावणाऱ्या जिद्द,ाहस ह्यांच्या प्रदर्शनाची संधी, यामुळे सांघिक भावनेचा उत्तम आविष्कार असलेल्या ह्या उत्सवाने  आपलेपणाचे मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या उत्सवामधे  महिलानीही साहसी वृत्तीच्या बाबतीत आपण तसूभरही मागे नाही हे सिध्द केले आहे. परंतु याच दहीहंडीच्या उत्सवावर घातलेल्या निर्बंधाबाबतचा वाद थेट न्यायालयात पोहोचल्याने सण उत्सव साजरा करताना पाळावयाच्या मर्यादांबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
अगदी अलिकडच्या काळामधे, सण उत्सवांबाबत निरनिराळी बंधने घालण्यात येऊ लागली. आवाजाचे प्रदूषण रोखण्यासाठी, ध्वनिवर्धकांच्या वापरावर विशिष्ट डेसिबल ची तसेच वेळेची मर्यादा घालण्यांत आली. विसर्जन मिरवणुका तत्सम मिरवणुकांवरही आवाज़ प्रदूषण रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरळित राखण्यासाठीही  बंधने घालण्यांत आली. फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यांत आले. नवरात्रामधे रात्र रात्र चालणाऱ्या दांडियाला रात्रौ १० वा. पर्यंतचीच मुभा देऊन चाप लावण्यात आला. महाराष्ट्रामधे कुतूहलाचा श्रध्देचा विषय ठरलेली बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी, जिवंत नागांची पूजा प्रदर्शनत्या निमित्ताने नागांचा छळ करण्यास केलेल्या मनाई मुळे यंदा केविलवाण्या पध्दतीने साजरी झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. रंगपंचमीच्या दिवशी नको ते 'रंग' उधळणाऱ्या रंगेल गड्यांना पोलीस कारवाईची वेसण घातली जाऊ लागली. पर्यावरणाची हानी करणारी वृक्षतोड होळीच्या निमित्ताने होत असल्याने त्या वर ही येणाऱ्या काळामधे कडक निर्बंध घातले जातील अशी शक्यता आहे. सण वार उत्सवावर ही बंधने घालण्यात न्यायालयेच अग्रेसर आहेत.  अलिकडच्या काळामधे पर्यावरण, प्रदूषण ह्या बाबत झालेली जागृती, निसर्ग प्राणिमात्र यांचे रक्षण करण्यासंबंधीच्या जबाबदारीची जाणीव, वाहतूक नागरी सुविधांवर पड़त असलेला ताण ह्या मुळे समाजातूनही सण उत्सवांवर विशिष्ट बंधने घालण्यासंबंधी आवाज़ उठू लागला आहे.
विविध सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध येत असताना हितसंबंधी नेते पक्षांनी मात्र याविरोधात आपल्या राजकारणाला सोयीस्कर असे अर्थ लावून ह्या निर्बंधाविरोधामधे ओरड सुरू केली आहे. कुणाला महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरा धोक्यात आल्याचा साक्षात्कार झाला आहे तर कुणाचा हिंदू धर्मावरच घाला आला असल्याचा ठाम  समज झाला आहे. सण उत्सवांच्या व्यापारीकरणाला हातभार लावून आपणच आपल्या प्रिय सण उत्सवांच्या मुख्य उद्दिष्टांचाच पराभव करीत आहोत याचे भान आपल्यालाही राहिले आहे कां? हाही एक प्रश्न आहे. राजकारण्यांनी आपले नेतृत्व मतदारसंघ मज़बूत करण्याचे माध्यम म्हणून उत्सवांचा वापर करण्यास सुरूवात केली लाखोंच्या संख्येने उत्सवामधे सहभागी होणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी  'मार्केटिंग' ची अनेकविध तंत्रे वापरली जाऊ लागली. लाखों रूपयांचे  प्रायोजकत्व ऊत्सवांना लाभू लागले त्यातून केल्या जाणाऱ्या भव्य सजावटी, माध्यमातून केली जाणारी अप्रत्यक्ष जाहीरातबाजी, बक्षिसांच्या भव्य रकमांचे त्यातून होणाऱ्या चुरशींचे आकर्षण यामुळे प्रचंड गर्दी ह्या उत्सवांना लोटू लागली. ह्या गर्दीचा लाभ घेऊन, राजकीय स्वार्थ साधणारे व्यावसायिक फ़ायदा उठवणारे सोकावले उत्सवा-उत्सवांमधे गर्दी खेचण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. थरांच्या हंड्या   थरावर पोहोचल्या.  लाखोंची बक्षिसे जाहीर करणारा एक समाजसेवक केवल ह्याच भांडवलावर उमेदवारी मिळवून निवडूनही आला. यंदा ठाण्यामधे एका 'डॅंशिंग' पुढार्याने १० थर लावून हंडी फोडल्यास २५ लाखांचे बक्षिसही जाहीर केले. राज्यमंत्री असलेल्या ह्या नेत्याच्या पुढाकाराने साजऱ्या होणाऱ्या दही हंडी उत्सवाने सर्व क़ायदे नियम धाब्यावर बसवून त्यांना अपेक्षित 'जल्लोषामधे'  उत्सव साजरा केला. राज्यकर्तेच ज़र न्यायालयांनाही वाकुल्या दाखवून आपले 'बालहट्ट' पुरवून घेऊ लागले तर सामान्य जन ही कसे मागे रहातील. अनेक छोट्या मोठ्या पुढार्यांनीही न्यायालयीन आदेशाचा 'दही काला' करून टाकला. म्हणायला ठाण्यांतील एका  लोकप्रतिनिधीने न्यायालयीन आदेशाचे पालन करून आपल्या उत्साही सहकारी लोकप्रतिनिधीना 'संस्कृतीचा' धड़ा घालून दिला.
दही हंडी च्या उत्सवावर घालण्यांत आलेले निर्बंध झुगारून देणाऱ्या नेत्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य शासनावर, न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई अपेक्षित आहे तशी ती होईलच, परंतु हिंदू धर्म पुरोगामी परंपराही धोक्यात आल्याची ओरड करून उत्सवांचे व्यापारीकरण विकृतिकरण करणाऱ्या  कथित हिंदू नेते पुरोगामी परंपरांचे स्वयंभू रक्षक ह्यांना समाज कसा आवर घालणार हा खरा प्रश्न आहे. लहानग्यांचे जीव धोक्यांत घालून स्वतःचे नेतृत्व मिरविणाऱ्यांचे इव्हेंट आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. वृध्द रूग्णांना वेठीस धरणारेआवाजाचे प्रदूषण वाहतुकीचा खोळंबा करणारे उत्सव आनंददायी असूच शकत नाहीत म्हणून यापुढे बंद! पर्यावरणाला हानी पोहोचवून सण साजरे करणे आम्हाला मान्य नाही. या अशाच भूमिका घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे ठोस भूमिका घेण्याची जबाबदारी समाज धुरिणांची सुसंस्कृत नेत्यांचीही आहे. सुदैवाने अशी भूमिका हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या शिवसेनेनचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ह्यांनी घेतली. पुढे मनसे प्रमुख राज ठाकरे ह्यानीही संयम पाळला. पुरोगामी म्हणवणारे शासनकर्ते मात्र नरो वा कुंजरो वा  अशा वृत्तीने आपल्याच हुल्लडबाज नेत्यांपुढे शरण गेले. येऊ घातलेला गणेशोत्सव, त्यानंतर येणार्या नवरात्रौत्सव पुढील अनेक उत्सव, हिंदूंचे अन्य धर्मियांचेही, समाजहिताच्या दृष्टिकोनातून नियमांच्या चौकटीत बसवावे लागतील उत्सव म्हणजे जोश-जल्लोष  परंतु होश बाळगूनच ह्याची जाणीव हुल्लडबाजांना करून द्यावी लागेल.

अजित सावंत

ajitsawant11@yahoo.com

Monday, May 5, 2014

रोखावेच लागेल आता मोरारजीच्या वारसांना!

        

                                              

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडल्या. अब की बार...म्हणत कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने गुजराती बांधव मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसले. मतदानाच्या सुट्टीला जोडून, आपल्या धंदा-व्यापारातून वेळ काढून गुजराती व्यापारी मुंबई बाहेर सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडत असत. लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर येथली रिसाॅर्टस् तुडुंब गर्दीने भरून वाहत. ही गर्दी प्रामुख्याने गुजराती भाषिकांची असे. ह्या वेळी मात्र अघटित घडले. ह्या सहलीच्या ठिकाणांकडे गुर्जर बंधूंची पावले वळलीच नाहीत. 'आपडा नरेनभाई माटे' सहलीच्या आनंदाचा त्याग करून मतदानाचे पवित्र कर्तव्य त्यानी पार पाडले. दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचा ऊमेदवार शिवसेनेचा असताना,मतदान केंद्राच्या बाहेर प्रदर्शित केलेल्या डमी मतपत्रिकेवर 'कमळ' कां दिसत नाही? हा प्रश्न अनेक गुजराती 'नवमतदार' विचारत होते. मुंबईतल्या मोदींच्या सभेतही ह्याच उत्साहाचे दर्शन घडले होते. कधीही कोणत्याही जाहीर राजकीय कार्यक्रमांना सहसा उपस्थित न रहणार्या बेपारीनी, नरेनभाईंच्या जाहीर सभेला आवर्जून उपस्थिति लावली होती. अब की बार, मोदी सरकार आणण्यासाठी करोडोंच्या थैल्या मोकळ्या करणार्या ह्या मोदी बंधूंसाठी खास शामियाना उभारून बसण्याची आरामदायी व्यवस्थाही करण्यांत आली होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार ह्यांनी आपले सारे कलाकौशल्य पणाला लावून भरलेल्या मैदानातली मराठी मायभगिनी-बांधवांची गर्दी मात्र कडक उन्हामधे अंगाची काहिली होत बेजार होऊन बसली होती. 

निवडणुकीदरम्यानचा 'नरेनभाई माटे, आपडा माणस माटे चा' उत्साह, मराठी माणसाना दिली गेलेली दुय्यम वागणूक ह्याच्या प्रतिक्रिया आता निवडणूक झाल्यानंतर उमटू लागल्या आहेत. मोदी जर चुकून माकून पंतप्रधानपदी विराजमान झाले तर मुंबई मधे गुजराती अधिकच वर्चस्व गाजवू लागतील अशी भीती काही राजकीय पक्षांना व नेत्यानाच नव्हे तर सामान्य मराठी माणसालाही वाटू लागली आहे. मुंबईतील मालाड,़कांदीवली, बोरीवली, घाटकोपर पााठोपाठ आता परळ-लालबाग, गिरगांव, दादर-शिवाजीपार्क, पार्ले-अंधेरी आदी मराठी वस्त्यावरील, मराठी ठसा पुसला जात आहे ह्याचा सल प्रत्येक अस्सल मराठी माणसाच्या मनात आहे हे नाकारून कसे चालेल? पुढच्या पालिका निवडणुकांमधे ह्या भागांमधून गुजराती भाषिक नगरसेवक निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको! मराठी माणसाच्या नांवाने राजकारण करणार्यांना हे कळत नाही असे नाही पण वळतही नाही असा अनुभव येत असल्याने, राज्यकर्ते मराठी परंतु मराठी जनतेची स्थिती मात्र 'असुनी नाथ मी अनाथ' अशी झालेली आहे.

मराठी जनांच्या मनामधे गुजरातींबद्दलची अढी व गुजराथ्यांच्या मनामधे मराठींबद्दल असलेला आकस आजचा नाही. परस्परांबद्लच्या ह्या भावनांचे मूळ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामधे आहे. गुजरात धार्जिण्या नेत्यांचा व उद्योगपतींचा मुंबई केंद्रशासित करण्याचा कुटिल डाव उधळून लावण्यासाठी अाचार्य अत्रे, एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे काॅ. डांगे ह्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामधे १०५ हुतात्म्यांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले. मराठी मनावर झालेल्या ह्या घावाची जखम आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही पूर्णपणे भरलेली नाही. मुंबई मधे व्यापार-धंद्यामधे करोडोंची गुंतवणूक करणार्या  शेठियांच्या मनामधे देखिल, ज्या मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात आहेत ती मुंबई आपण राजकीयदृष्ट्या गमावल्याचे शल्य आजही ठसठसत असते. ही खदखद, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची' अशा घोषणांतून बाहेर पडते. गुजरातवर ओढवलेले नैसर्गिक संकट असो वा मोदींची पंतप्रधान होण्याची आकांक्षा, थैल्या घेऊन धावत सुटणारे ज्या महाराष्ट्रामधे अमाप संपत्ती मिळवतात त्याच महाराष्ट्रावरील आपत्ती  प्रसंगी हात आखडता घेतात हे पाहून मराठी माणसांचे पित्त खवळले तर त्यांचे काय चुकले?

आज मराठी माणसासमोर मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाबरोबरच मराठी संस्कृतीच्या रक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.  गिरणगांवाच्या छाताडावर उभे राहिलेल्या ऊत्तुंग टॅावर खाली आपले खोडकर बालपण, तारूण्यातला जोश गाडला गेला आहे ह्या जाणीवेने तो अस्वस्थ आहे. ज्या गिरण्या-कारखान्यांमधे आपण, आपल्या बापजाद्यांनी घाम गाळला तेथे उभ्या राहिलेल्या भव्य आलिशान माॅल मधे प्रवेश करताना त्याची छाती दडपून जाते. जिवाभावाचे नाते ज्यांच्याशी जुळले ती मैदाने, त्या शाळा कधी गायब झाल्या ते त्याला कळले देखिल नाही. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर, ज्यूस च्या स्टाॅलसमोर गाड्यांमधून येणार्या धनिक-वणिक बाळांचे अड्डे जमू लागले. ह्या गर्दीमधे सामान्य मराठी माणसाला बुजल्यासारखे होते. बर्याचदा गृहनिर्माण वसाहतींमधे वा उरल्यासुरल्या चाळींमधे मराठी माणूस अल्पसंख्यक होऊ लागला आहे. वसाहतीमधला सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रामधला दांडिया यांची एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली आहे. आपल्या वसाहतींमधे मराठी माणसाना जागा विकत घेता येऊ नयेत याचे 'मांसाहारीना मज्जाव करणारे' अलिखित नियम कठोरपणे पाळणारे मात्र आपल्या भाईबंदानाच जागा घेता यावे ह्याचे डाव रचत आहेत. परिस्थितीच्या रेट्याने किंवा चाळमालकाच्या दबावाने ह्याच मंडळीना जागा विकणे मराठी माणसाला भाग पडत आहे. आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवावेत अशा मागण्याबरोबरच, आपल्या वसाहतीजवळचा मासळी बाज़ार हटविला जावा अशी कुजबूजही ह्या पक्क़्या शाकाहारीनी सुरू केली आहे.  गिरगांव मधील 'अनंताश्रम' ह्या सुप्रसिध्द परवडणार्या खानावळी पाठोपाठ लालबागचे 'क्षीरसागर', 'दत्त बोर्डींग' ह्या सारखी मांसाहारींची आवडती ठिकाणे, ह्या परिसरांतील मांस-मच्छी न खाणार्या वाढत्या लोकसंख्येमुळे काळाच्या उदरांत गडप होणार नाहीत ना? याची चिंताही मांसाहार प्रेमीना सतावू लागली आहे. सेनाप्रमुखांनी आवाज दिला तेंव्हा कोहिनूर मधे सोंगाड्या प्रदर्शित झाला हा इतिहास मराठी माणूस विसरलेला नाही. आज 'भारतमाता' चा घास घ्यायला टपलेल्यांपासून कधीही धोका होऊ शकतो ह्याची जाणीव मराठी चित्रपट रसिकाला आहे. ह्या सगळ्याला धनदांडग्या मुजोरीचा दर्प असल्याची  मराठी माणसाची खात्री पटली आहे. 

मराठी माणसाची ही अस्वस्थता समजून घेण्यामधे मराठीचा ठेका घेणारे राजकीय पक्ष व नेते दुर्दैवाने कमी पडत आहेत वा येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांतील मतांच्या हिशेबांनी त्यांचे ओठ शिवून टाकले आहेत. एखाद्याने ह्या मराठी संस्कृतीवर छुपा हल्ला चढविणार्या प्रवृतींशी 'सामना' करण्याचा रिकामटेकडा उद्योग केलाच तर त्याला त्याचे वरिष्ठ नेतेच तोंडघशी पाडत आहेत. ६० च्या दशकात कारकुनी करणार्या दक्षिण भारतीयांविरोधात 'बजाव पुंगी हटाव लुंगी' चा नारा देणार्या व ७७सालीच ह्या 'मोरारजीच्या वारसांची' पावले ओळखून, त्यांना ठाकरी भाषेत समज देणार्या शिवसेनाप्रमुखांचे वारसदार,आज ह्या धनशक्तीसमोर हतबल झाल्याचे विदारक चित्र पाहून मायमराठीच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत. आता पुन्हा पेटून उठावे लागेल ते मराठी माणसालाच!  आपल्या चुकांचे व उणीवांचे आत्मपरिक्षण करून, आपल्या एकजुटीची वज्रमूठ उगारण्यांत जर आम्ही मराठी कमी पडलो तर  रक्त सांडून मिळविलेली मुंबई, महाराष्ट्राला गमवावी लागेल. अब की बार जर मोदी सरकार आलेच तर हे घडवण्याची कारस्थाने रचली जातील म्हणूनच आता मोरारजीच्या वारसांना रोखावेच लागेल मुंबईतली मराठमोळी संस्कृती टिकविण्यासाठी!

अजित सावंत
मो. ९८२००६९०४६
ajitsawant11@yahoo.com


Thursday, August 1, 2013

लोकशाही धोक्यात आणणारा काॅर्पोरेट उद्योग


आजच्या लोकसत्तामधे 'कुणाच्या भांडवलावर कुणाची हा लेख  राजीव साने ह्यांनी लिहून, आम्हां वाचकांना उद्योग व श्रमिक यांच्यामधल्या बदललेल्या नात्याचे पदर उलगडून दाखवले आहेत. आपण वर्णिलेल्या मॅनेजमेंटशाहीलाच अलिकडे काॅर्पोरेट व्यवस्थापन असेही म्हणतात. व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षित तरूणांचेही ह्या क्षेत्रात 'टाॅपवर' जाण्याचे स्वप्न असते. हीच मंडळी पुढे आपल्या ज्ञानामुळे व अनुभवामुळे, ज्यांचे भांडवल व जोखीम अत्यल्प आहे त्यांच्या हातचे बाहुले बनून उद्योगातील श्रमिकांचे शोषण करण्याच्या, ग्राहक/करदाता/बचतदार ह्यांना भुलविण्याच्या, इन्स्टिट्यूशनल फायनान्स उपलब्ध करण्याच्या युक्त्या-प्रयुक्त्या शोधून काढतात. चाकरी, भले ती गलेलठ्ठ पगाराची असो, बजावणारी हीच मंडळी पंचतारांकित हाॅटेलांमधून भरणार्या परिषदा-परिसंवादांमधून,काॅर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलिटी, उत्तम औद्योगिक संबंध राखण्याच्या पध्दती आदिंवर भरल्या पोटी चर्चा करतात. हे करीत असताना आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करीत असलेल्या श्रमिकांच्या, ग्राहकांच्या,बचतदारांच्या शोषणाला त्यांनी सोयीस्कररीत्या नजरेआड केलेले असते. 

आज उद्योगांमधे, मग ते खाजगी असोत वा सार्वजनिक, सरकारी आशिर्वादाने आपण सूचित केल्याप्रमाणे श्रमिकांचे शोषण उच्च कोटीला पोहोचले आहे. कंत्राटी कामगार प्रथेच्या अनिर्बंध वापरामुळे,मग ते सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार,लोडर आदि अल्पशिक्षित असो़त वा आयटी शी संबंधित सुशिक्षित/उच्च शिक्षित अभियंते असो़त, सारेच व्यवस्थेचा बळी ठरले आहेत. नोकरीची हमी म्हणजेच 'जाॅब सिक्युरिटी' तर कधीच इतिहास जमा करण्यांत आली आहे. कायद्यांचे संरक्षण हिरावून घेतलेल्या ह्या वर्गामधे असंतोषाची व नैराश्याची अदृश्य भावना वाढीस लागली आहे. त्यांत भरीस भर म्हणून महागाईने व करवाढीच्या ओझ्यांने कंबरडे मोडलेल्या सामान्य ग्राहक,गुंतवणूकदार, करदात्यामधेही अस्वस्थता वाढीस लागली आहे. ह्याची दखल वेळीच घेतली नाही तर इजिप्त,ब्राझील,ट्युनिशिया,तुर्कस्तान प्रमाणे असंतोषाची त्सुनामी येण्याचा दिवस उजाडण्यास फार जावा लागणार नाही. जे घडेल त्यांस काही प्रमाणात ह्या 'शाह्या' जबाबदार असतील. जगातील आदर्श लोकशाही व्यवस्था धोक्यामधे आणण्याचे पाप त्यांच्याकडून घडू नये ही अपेक्षा!

Friday, July 19, 2013

भ्रष्ट लायसन्स् अधिकार्यांना कारवाईचा 'जमाल'गोटा द्या!

पालिकेच्या जी उत्तर विभागातील लायसन्स् विभागाच्या वरिष्ठ निरिक्षकाला, दादर पश्चिम येथील भाजी विक्रेत्याकडून  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. ह्या वृत्तामधे, 'जमाल' नावाच्या मध्यस्थामार्फत भाजीविक्रेत्याने दरमहा सुमारे पंधरा हजार रूपये दिल्याचे म्हटले आहे. ह्यावरून पालिकेमधे भ्रष्टाचाराचा रोग किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे ह्याची कल्पना येते. जकात,मालमत्ता कर,इमारत प्रस्ताव, इमारती व कारखाने,ह्या मलईदार खात्यांबरोबरच्या भ्रष्ट स्पर्धेमधे,आरोग्य,शिक्षण व अनुज्ञापन ही खातीही मागे रहाण्यास तयार नाहीत हे या पूर्वीही अनेक प्रसंगी सिध्द झाले आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील अतिक्रमणे व फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, लायसन्स खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी फेरीवाल्यांकडून किती माया गोळा करतो हे पहाणे धक्कादायक आहे. केवळ दादर पश्चिम येथे सेनापति बापट मार्गावर, सुमारे ५०० च्या वर भाजी विक्रेते बसतात. फक्त ह्या भाजीवाल्यांकडूनच ५० लाखांच्यावर रक्कम जमा केली जाते. जी उत्तर विभागातील, रानडे रोड, केळकर मार्ग, दादर स्टेशन परिसर, कबुतर खाना परिसर, डिसिल्वा मार्ग येथून व माहीम दर्गा परिसरात रस्त्यावर रात्रौ उशिरापर्यत चालविल्या जाणारे अनधिकृत हाॅटेलवाले, यांच्याकडून जमा करण्यात येणारी रक्कमही दरमहा कोटींच्या घरात जाते. पालिकेच्या इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गही ह्या भ्रष्ट उद्योगामधे हिरीरीने सहभागी होऊन आपआपल्या घरांवर सोन्याची कौले चढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा प्रकारे हा कोट्यावधींचा भ्रष्ट उद्योग अव्याहतपणे सुरू असतो. 'वर पर्यंत पोहोचवावे लागतात' असे सांगणारे ह्या मधे 'वरचेही' सामील आहेत याची कबुली देतात. 

ह्या मनोरंजक उद्योगाची माहीती घेताना, मध्यस्थाची भूमिका 'जमाल' कशा प्रकारे पार पाडतो हे पहाणे आवश्यक आहे. दि. १०. ९.२००७ च्या स्थापत्य समितीच्या बैठकीमधे नगरसेविका मीना देसाई ह्यांनी 'जमाल' च्या ह्या भूमिकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्यांनी फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करण्यासाठी नेमलेला 'जमाल' आहें तरी कोण? अशी विचारणा त्यांनी केली होती. ह्या प्रश्नाला दि. २४.१०.०७ रोजी पालिकेकडून मासलेवाईक उत्तर देण्यात आले. कर्मचारीवृंदामधे श्री. जमाल नांवाची कोणतीही व्यक्ती कार्यरत नाही" असे नमूद करून या बाबत पोलीसांकडे पाठपुरावा करण्याचा सल्लाही मोंठ्या शहाजोगपणे देण्यास पालिकेचे अधिकारी कचरले नाहीत. एव्हढेच नव्हे तर या भानगडीत पडू नये असा मानभावी सल्लाही एका स्वपक्षीय आमदारामार्फत नगरसेविकेला देण्यात आला. २००७ साली ह्या घटनेवर पांघरूण घालणारे अधिकारी, 'जमाल' हा पालिकेच्या अधिकार्यांनी हप्ते वसुलीसाठी नेमलेला 'दलाल' आहे हे आता स्पष्ट झाल्यांने चांगलेच उघडे पडले आहेत. 

मुंबईतील रस्त्यांवरील अतिक्रमण रोखावयाचे असेल तर, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी होईल तेंव्हा होईल, परंतु प्रथम असे 'जमाल' नेमून परस्पर हप्ते वसुली करणार्या अधिकार्याना कठोर कारवाईचा 'जमालगोटा' द्यावयास हवा . ह्या साठी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आग्रह महापालिका आयुक्तांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धरावयास हवा म्हणजेच हप्ते वसुलीतून जमा झालेली कोट्यावधीची रक्कम वर पर्यंत म्हणजे नेमकी कुठपर्यंत जाते ते कळेल व ह्या भ्रष्टाचारास आळा घालण्याची योजना आखता येईल.